top of page

खरंच, माणुसकी शिकलो!

  • Apr 27, 2020
  • 4 min read

चीनमधील वुहान शहरामध्ये कोरोना व्हायरसची सुरवात झाली. वुहानमध्ये कोरोनाचे अनेक रूग्ण आढळले. हा संसर्गजन्य रोग असल्याने नेपाळ, कॅनडा, थायलंड, अमेरिका, जपान, इटली, भारत अशा अनेक देशांमध्ये हा रोग पसरला. भारतातील हवामान बदलत असून कोरोना विषाणुचा धोका वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला. कोरोना व्हायरस हा प्रथम सामान्य सर्दीसारखा भासतो मात्र नंतर श्‍वास घेण्यात अडचणी येतात व अंगदुखी वाढीस लागते. यावरुन कोरोना झाल्याचे निदान होते. हा आजार बळावल्यामुळे निमोनिया, किडनी फेल यांसारखे भयंकर आजार होऊन प्रसंगी मृत्युही ओढवु शकतो. यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. जसे की हात स्वच्छ धुणे, सॅनिटायजर वापरणे, चेहर्‍याला मास्क वापरणे, हॅन्डग्लोज वापरणे, शिंकताना रुमाल वापरणे, बाहेर जाणे टाळणे, लोकाच्या संपर्कात न येणेे. अनेक वर्षांपूर्वी ऐकले होते, निसर्गाला कोणीही चॅलेंज करु शकत नाही पण आजची तरुण पिढी ऐकण्याच्या तयारीत नसते. तरुण वर्ग वयस्कर मंडळींना सतत म्हणत असतात, ‘‘तुम्हाला काय माहिती आहे मेडिकल सायन्स किती पुढे गेले आहे? आणि आजच्या युगात हाय टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. आपण 2020 च्या युगात जगत आहोत. कोणती ती अदृश्य शक्ती, कोणता तो देव, कोणत्या त्या सूक्ष्म लहरी आणि कसला तो निसर्ग?’’ आता काय 2020 मध्ये तर सर्व लोकाना समजले त्या अदृश्य विषाणुमध्ये किती ताकत आहे? विविध देशांनी म्हणे मोठमोठे परमाणु बॉम्ब तयार केलेत लढण्यासाठी आणि एका छोट्या विषाणुला लढण्यासाठी संपूर्ण पृथ्वीवरील लोकाचे बुद्धीकौशल्य पणाला लावून सुद्धा या इवलुश्या विषाणुला मारण्यासाठी कोणतीही साधी लस किंवा कोणतेही औषध तयार करु शकले नाही. विश्‍वास बसत नाही पण हे कटु सत्य आहे. हायटेक्नोलॉजीच्या युगात ज्याप्रमाणे अदृश्य विषाणु आपण मानु लागलो बरोबर ना... त्याचप्रमाणे अदृश्य श्रीराम, अल्लाह, गुरुनानकदेव, जीसस तसेच गुरुद्वारा, मंदिरातील मुर्ती, नामस्मरण, यज्ञ, याग, पारायणे, मंत्रे, श्‍लोक, ह्यांची ताकद समजु लागली आहे. डॉक्टर व पोलीस 24 तास सर्व लोकासाठी सेवा देत आहेत. तेही स्वत:चा जीव धोक्यात घालून. त्यांना तर धन्यवाद किंवा त्यांचे आभार मानले तरीपण कमीच पडतील. संपूर्ण जीवन बदलून गेल आहे. ह्या विषाणुंमुळे काही फायदे व काही तोटे तर जरुर झाले. नोकर्‍या, व्यापार, बस सेवा, रेलवेसेवा सर्वत: बंद पडले. काही लोकाचे प्राण गेले, काही लोकावर उपासमारीची वेळ आली. या कोरोना विषाणुमुळे सर्व जनता घरात सुखरुप बसली म्हणून ऍक्सीडेंटच्या बातम्या अत्यंत कमी झाल्या. घरातल्या लोकाना आपल्याच घरातील अन्नपुर्णा असलेली आई, बहीण, पत्नी ह्यांचे महत्त्व चांगलेच समजले कारण घरात जेवण तयार असताना ऑनलाईन बुकिंग करुन काही लोक हॉटेलचे डब्बे मागवत होती. काहीजण तर घरी राहणार्‍या मंडळींना म्हणत असतात की, तुम्ही घरी बसुन काय करतात? त्यांना जणु सर्वच उत्तरे मिळालीत कारण धुणी-भांडी घासणार्‍या बाया सुध्दा स्वत:च्या घरी बसुन आहेत. काही मजुरीवर काम करणारे लोक, ज्यांचे पोट हातावर आहे अशा प्रकारच्या लोकावर दु:खाचा डोंगर पडलाय. त्यातले अनेकजण तर 250 किमी पायी चालत चालत घरी जात आहेत. कोणाचे घर 500 किमी दूर आहे. रस्त्यात गाड्या बंद, हॉटेल बंद, खाण्यापिण्याच्या सोयीचा काही पत्ता नाही. संपूर्ण कुटुंब, परिवार मग यात 4 ते 5 वर्षांची चिमुरडी सुध्दा छोट्या छोट्या पावलांनी आईबाबासोबत पायीच गावी जात आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अरे कोणी कुठेही थांबायच्या तयारीत नाहीत. अतिशय आव्हानात्मक परीक्षा सध्याच्या काळात आपण सर्वच देत आहोत. ‘वसुधैव कुटुम्बकम’चा अर्थ आज चांगलाच समजला. हे सर्व घडत असताना अनेक लोकानी पायी चालत असणार्‍या लोकासाठी चेहर्‍याला मास्क आणि हॅन्ड ग्लोज घालुन इंन्फेक्शन होवू नये म्हणून जेवण दिले. काही दानशुर व्यक्तींनी पंतप्रधान केअर फंडमध्ये पैसे दिलेत. आर्थिक मदत केली. काही लोकानी धर्मशाळा भक्तनिवास बंद केलेल्या पुन्हा जनतेसाठी उघडल्या. थकलेल्या भागलेल्या लोकाना मदत म्हणुन. निसर्गाने मनुष्याला अनेकदा चेतावणी दिली. त्सुनामी, भूकंप, झाडे तोडल्याने जास्त प्रखर उष्णता निर्माण होते. वर्षानुवर्ष उष्णता वाढत आहे. ही निसर्गाची सूचना होती पण माहिती असून सुध्दा ऐकले नाही. आताची पिढी जगेल पण आपल्याच घरातील पुढची पिढी स्वच्छ, सुंदर निसर्गाशिवाय कशी जगु शकेल ह्याचा विचार करायला हवा. जर आपण कोरोनापासून आताच काही धडा घेतला नाही तर पुन्हा आयुष्यात काहीच शिकण्यासारखे राहणार नाही. प्राचीन काळापासून योगाचा अभ्यास करावा हे सांगितले. आयुर्वेदिक औषधी घ्यावीत कारण त्या औषधीच्या वापरामुळे रोगांचा समूळ नाश होतो. योगामध्ये सूर्यनमस्कार, प्राणायाम, अनुलोमविलोम, नियमित करायलाच पाहिजेत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कोरोना विषाणुमुळे लोकाना जीवनाचे गांभीर्य लक्षात आले. कुटुंबासोबत महत्त्वाचा वेळ व चर्चा करता आली. स्वत:च्या घरी बसुन लोकाची किंमत कळाली. अनेक श्रीमंत लोक पैशाच्या मागे धावणारी अचानक घरी बसुन पण आयुष्य थोड शांत व व्यवस्थित जगता येते हे समजले.

निसर्गाने कधीच नियम बदलले नाही. सूर्य आज पण सकाळीच उगवतो व सायंकाळी मावळतो आणि चंद्र व चांदण्या आकाशात रात्रीच येतात. झाडांनाही बिया पेरल्यापासून रोज थोडे थोडे पाणी घातल्याने लहान अंकुर फुटतात. मग थोडे थोडे मोठे होत काही दिवसांनी फुले व फळे येतात. झाडाला हाच नियम सुरु आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असेच सुरु आहे. आज पण सातारा येथील कास पठारावर फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्याच महिन्यात सुंदर सुंदर अशी अप्रतिम फुले येतात. अशाप्रकारे जर निगसर्गाने स्वत:चे नियम कधीच बदलले नाही तर आपण तरी निसर्गाच्या विरुध्द का वागावे? आजपण समुद्राच्या लाटा स्वत:च्या मर्यादेत आहेत.

आज कोरोना विषाणुने खूप मोठी अद्दल घडवली माणसाला. पहिले मनुष्याला वाटत होते की आपणच आहोत या सृष्टीला चालविणारे पण आपण आता कैदेत आहोत. एकाच ठिकाणी थांबुन पण सृष्टी तर चालतच आहे. दिवस व रात्र हे होतच आहेत. कोरोनामुळे आपण इतके दिवस घरी बसलोत. वाचन, लिखाण, चित्र काढणे, स्तोत्र, मंत्र म्हणणे, व्यायाम करणे, छंद जोपासणे, अचानक जुन्या आठवणीत रमुन जाणे हे चांगलेच जमले. यामुळे अनेक दिवसांनी चिमण्याचा चिवचिवाट ऐकला. मोबाईलवर का होईना पण पाण्याचा निखळपणा, त्याचा सुमधूर आवाज ऐकता आला. आपण अनेक दिवस कुटुंबासोबत आहोत. अतिमहत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडत होतो. हा नियम संपूर्ण भारतात पाळला. निसर्गाचे खूप खूप आभार आहेत तो आपल्याला हवा, पाणी, प्रकाश देतो आणि तेही विनामूल्य. डॉक्टर, पोलीस हे जणु पृथ्वीवरचे देवच आहेत असे वाटत आहे. 2020 प्रत्येक जण लक्षात ठेवील ही महामारी कशी आली आणि किती जणांचा मृत्यू या महामारीमुळे झाला. अनेक लोक मोठी झुंज, मोठी लढाई जिंकुन घरी सुखरुप आले. काही दिवसांनी हे वादळ परतीच्या प्रवासाला जाईल व नष्ट होईल यात शंकाच नाही. इतिहास मात्र घडविला या कोरोनाने.

- राधिका मोहरील

नाट्य समीक्षक

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page