येशू ख्रिस्त : एक काल्पनिक व्यक्ती?
- Jyoti Ghanshyam
- Jan 31, 2022
- 17 min read
येशू ख्रिस्त आणि त्याचे जीवन हा नेहमीच चर्चेचा आणि वादांचा विषय राहिला आहे. श्रद्धाळू ख्रिश्चनांचा बायबलवर अढळ विश्वास असल्याने अर्थात ते या वादांकडे आणि विद्वानांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्यास आणि आक्रमक होत असल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही परंतु संशोधनाच्या आणि चिकित्सेच्या जगात श्रद्धेला स्थान नसते. किंबहुना अनेक श्रद्धा अंधश्रद्धा बनण्याच्या मार्गावर असताना चिकित्सा या श्रद्धांचा भंग करत मानवी जगाला स्वच्छ आणि नितळ दृष्टी द्यायचे कार्य करत असते. ख्रिस्ती धर्माची मान्यता आहे की पॅलेस्टाइनमधील जेरूसलेमजवळील बेथलेहेम नावाच्या लहानशा गावात एका यहुदी (ज्यू) कुटुंबात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. वयाच्या 27-30 च्या दरम्यान त्याने लोकांना शिक्षण देणे व रोगमुक्त करणे अशा सेवाकार्याला प्रारंभ केला. त्याने भूतलावर फक्त तीन वर्षे आपले कार्य केले पण त्याने सेवाकार्य सुरू करण्याआधी त्याचे आयुष्य कोठे आणि कसे गेले याबाबत बायबल मूक आहे. तेवढ्या तीन वर्षांच्या अवधीत येशूने परमेश्वराविषयीचे व मानवाविषयीचे खरे ज्ञान आपल्या सभोवतालच्या मानवांना करून दिले. त्याने बारा लोक निवडून घेतले व त्यांचे शिष्य बनले. त्यापैकी एकाने शत्रूला फितूर होऊन येशूला धरून दिले व अशा रीतीने तो त्याच्या मृत्युस कारणीभूत झाला, अशी बायबलची थोडक्यात पार्श्वभूमी आहे. कधीकधी येशू ख्रिस्ताचे वर्णन एक थोर सुधारक म्हणून करण्यात येते. आपल्या लोकांसाठी म्हणजे यहुद्यांसाठी, तत्कालीन अन्यायी रोमन सत्ताधार्यांना उलथून टाकण्याचा त्याने केव्हाच विचार केला नाही. त्या वेळची प्रचलित धर्मपद्धती ही फार कर्मठ बनली होती व लोकांना त्या धर्मपद्धतीपासून कसला आनंदही होत नव्हता व आशाही वाटत नव्हती परंतु ही धर्मपद्धती नष्ट करून त्या जागी नवीन धर्म स्थापावा असाही त्याचा उद्देश नव्हता. किंबहुना येशू खरेच झाला असेल तर तो ज्यू म्हणूनच जन्माला आला व ज्यू म्हणूनच त्याचा अंत झाला. त्याने प्रत्यक्षात स्वत: कोणत्याही धर्माची स्थापना केली नाही परंतु परमेश्वराने दिलेल्या जुन्या करारात समाविष्ट असलेल्या दहा आज्ञांचा नवा व समर्पक अर्थ त्याने सांगितला असे मानले जाते तसेच परमेश्वरावर जिवंत श्रद्धा असणे ही गोष्ट इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आवश्यक आहे, असेच त्याने शिकविले. खरे तर अन्यायी रोमन सत्तेविरुद्ध बंड करणे हाही येशूचा उद्देश नव्हता. पण त्या वेळी बायबलनुसार एकंदरीत तीन गट येशूचा द्वेष करत होते : (1) धार्मिक कायद्यांचे काटेकोरपणे पालन करू पाहणारे सनातनी ज्यू, (2) रोमन सत्तेविरुद्ध बंड करू इच्छिणारी सामान्य जनता व (3) श्रीमंत लोक. हे तिन्हीही गट त्याला पकडण्याच्या संधीची वाटच पाहत होते. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, ह्याची पूर्ण कल्पना असतानाही येशूने आपल्या शिष्यांसमवेत शेवटचे भोजन केले. त्यानंतर त्याला पकडण्यात आले व खटला चालून त्याला क्रूसावर चढविण्यात यावे, अशी शिक्षा फर्मावण्यात आली. रोमन सुभेदार पायलटपुढे त्याला उभे करण्यात आले. त्याने रोमन सत्तेविरुद्ध बंडाचा उठाव केला असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. ही गोष्ट त्याने कधीच केली नव्हती पण आपल्या सत्तेखाली असणार्या लोकांच्या जीवनात खळबळ माजेल अशी कोणतीही गोष्ट रोमन सत्ताधार्यांना नको होती आणि म्हणूनच येशूचे कार्य खरेच काय आहे, याची सखोल चौकशी त्यांनी केली नाही आणि येशूला जनतेच्या दबावानुसार क्रूसावर चढवण्याची शिक्षा देण्यात आली. स्वतःला असह्य वेदना होत असतानाही येशूने आपला छळ करणार्यांसाठी प्रार्थना केली की ‘हे परमेश्वरा, त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही’. येशूला एका कबरीत पुरण्यात आले. त्याचे शिष्य पळून गेले. आपला प्रभू आपल्याला परत पाहायला मिळेल असे त्यांना वाटले नव्हते. पुनरुत्थानानंतर येशूने आपल्या शिष्यगणांपैकी सेंट पीटर (पेत्रस, पहिले शतक) ह्या शिष्याला प्रथम दर्शन दिले. आपण येशूचे शिष्य आहोत, हे ह्याच पीटरने त्रिवार नाकारले होते. येशूच्या इतर शिष्यांनी व अनुयायांनीही येशूला पुनरुत्थानानंतर पाहिले होते. काहींनी येशूला प्रत्यक्ष पाहिले नाही तथापि त्यांनी त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला कारण ज्यांनी येशूला प्रत्यक्ष पाहिले त्यांच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला. अर्थात येशूला ज्यांनी पाहिले असा दावा केला त्याच्या कथनातील सत्यासत्यता पडताळून पाहिली गेली नाही. चर्चचा व पर्यायाने ख्रिस्ती धर्माचा पहिला मिशनरी म्हणजे सेंट पॉल (सन. 3-67) हा होय. ख्रिस्ती धर्म हा यहुदी धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्याला सुरूवातीला वाटत होते, म्हणून त्याने सुरूवातीला ख्रिस्ती धर्माला फार विरोध केला. येशू ख्रिस्ताच्या अनुयायांचा छळ करण्यासाठी तो दमास्कसला जात असता त्याला आलेल्या एका विलक्षण अनुभवामुळे त्याचा हा दृष्टीकोन बदलला. त्याने तीनदा देशपर्यटन करून ख्रिस्ती धर्माचा जोरात प्रसार केला. त्या अर्थाने सेंट पॉल हाच ख्रिस्ती धर्माचा संस्थापक होय, असेही मानले गेले असल्यास नवल नाही. ह्याच सुमारास येशूच्या पहिल्या बारा शिष्यांपैकी काही वेगवेगळ्या देशांत गेले. त्यांच्यापैकी एक भारतात आला. त्याचे नाव टॉमस (सु. पहिले शतक). ‘मार्थोमा’ नावाचे चर्च त्याने स्थापन केले. ख्रिस्ती इतिहासानुसार अगदी सुरूवातीच्या ख्रिस्ती लोकांना ‘मार्गाचे वा पंथाचे अनुयायी’ म्हणत असत. यहुदी लोक आपला छळ करताहेत हे पाहून ते जेरूसलेम व पॅलेस्टाइन येथून पळून गेले परंतु नेमका ह्यामुळेच ख्रिस्ती धर्माचा इतरत्रही प्रसार झाला. साहजिकच रोम हे ख्रिस्ती धर्माच्या कार्याचे केंद्र बनले परंतु लवकरच रोमन लोकही त्यांचा छळ करू लागले. ख्रिस्ती अनुयायांनी जर ख्रिस्ती धर्मावरील आपल्या विश्वासाचा त्याग केला व ते आपल्या पूर्वीच्या देवांच्या भजनी लागले तरच त्यांना क्षमा करण्यात येई. काहींनी भीतीमुळे कदाचित आपल्या धर्मनिष्ठेचा त्याग केलाही असेल परंतु बहुतांश लोकांची ख्रिस्ती धर्मावरील निष्ठा अढळ राहिली. मार्कस ऑरिलियसच्या (121-180) नेतृत्वाखाली हे छळण्याचे सत्र वर्षानुवर्षे चालले होते. सन 250 मध्ये डेशिअस (201-251) सम्राटाने जो छळवाद सुरू केला तो पूर्वीच्या छळवादापेक्षाही महाभयानक होता. त्यामुळे चर्चच्या अनुयायांची संख्या बरीच रोडावली पण निष्ठावंत ख्रिस्ती लोकांनी धर्मप्रसाराचे कार्य पुढे नेटाने चालविले. अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागूनही ख्रिस्ती धर्माचा प्रसार होणे चालूच राहिले. शिवाय प्रत्येक वेळी सर्व ठिकाणचे सर्वच ख्रिस्ती लोक शोधून काढून त्यांचा नायनाट करणेही विरोधकांना शक्य नव्हते. गॉल (फ्रान्स) मध्ये जेव्हा छळवाद सुरू होई तेव्हा आफ्रिका व ग्रीसमध्येही छळवाद सुरू असेच असे नाही. दुसर्या शतकात छळवादाची तलवार कधी एका भागात चालविली जाई तर कधी दुसर्या भागात परंतु एकाच वेळी सर्व राष्ट्रांत ती चालवली जात नसे. तिसर्या शतकात सुमारे 50-50 वर्षाचे दोन कालखंड ख्रिस्ती लोकांना जवळजवळ संपूर्ण शांततेचे लाभले. सन 202 आणि 250 च्या सुमारास रोमन लोकांनी ख्रिस्ती धर्म नेस्तनाबूत करण्याचा जोराचा प्रयत्न केला. ख्रिस्ती धर्मास तौलनिकदृष्ट्या जो शांततेचा काळ लाभला त्या काळात ख्रिस्ती लोकांनी आपल्या धर्माची काही तत्त्वे निश्चित केली आणि चर्चच्या व्यवस्थापनेला निश्चित स्वरूप देण्यास प्रारंभ केला. ह्याच काळात नव्या करारातील पुस्तके निश्चित करण्यात आली. सुरूवातीला ‘सेंट पॉलची पत्रे’, ‘चार शुभवर्तमाने’ व ‘प्रेषितांची कृत्ये’ ह्या पुस्तकांचा नव्या करारात समावेश करण्यात आला. नव्या करारातील आज उपलब्ध असलेल्या इतर पुस्तकांचा नंतर हळूहळू त्यात समावेश करण्यात आला. ‘योहानचे शुभवर्तमान’ व ‘प्रकटीकरण’ ह्या पुस्तकांचासुद्धा नव्या करारात सहजासहजी प्रवेश झाला नाही. ‘हिब्रू लोकांस पत्र’, ‘पीटरचे दुसरे पत्र’, ‘यहुदाचे पत्र’, ‘याकोबचे पत्र’ व ‘योहानची (जॉनची) शेवटची दोन पत्रे’ ही पुस्तकेसुद्धा यथावकाश नव्या करारात स्वीकारली गेली. नव्या करारात स्वीकारावयाच्या पुस्तकांची यादी चौथ्या शतकात पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्यात दुसर्या कोणत्याही पुस्तकाचा समावेश केला गेला नाही. अशा रीतीने चौथ्या शतकात बायबलला अंतिम रूप मिळाले. डायोक्लीशन (सन 245-313) या रोमन सम्राटानंतरचा सम्राट कॉन्स्टंटीन (280-337) याने ख्रिस्ती लोकांचा छळवाद बंद केला परंतु त्यासाठी त्याला बराच काळ झगडावे लागले तसेच तो सुरूवातीला ख्रिस्तीही नव्हता. डायोक्लीशन सम्राटाला आपल्या अवाढव्य साम्राज्याचा कारभार एकट्याने पाहणे फार अवघड वाटले. म्हणून त्याने आपल्या साम्राज्याचे विभाग केले व त्यांवर आपल्या कारभारात मदत करण्यासाठी सहाय्यक राजे नेमले. तो जेव्हा वृद्ध व सेवानिवृत्त झाला तेव्हा हे राजे आपापसात भांडू लागले. त्यांचे पुत्रही आपापसात भांडू लागले. कॉन्स्टंटीन हा त्यापैकी एका राजाचा मुलगा तर मॅक्झेन्शिअस हा दुसर्या राजाचा मुलगा. कॉन्स्टंटीनची ब्रिटन व गॉल ह्या देशांवर सत्ता होती. कॉन्स्टंटीन रोमवर चालून गेला (312), तेव्हा सूर्यास्ताच्या सुमारास वरच्या बाजूस आकाशात त्याला प्रकाशमान क्रूस दिसल्याचे सांगतात. ह्या क्रूसावर ‘खप केल डळसपे तळपलशी’ असे लिहिलेले त्याला दिसले. त्याचा अर्थ ‘ह्या खुणेनेच तुला जय मिळेल’ असा आहे. ते काहीही असले तरी त्या काळात ख्रिस्ती चर्चचा एवढा प्रभाव होता की ‘ख्रिस्ती परमेश्वर हाच सर्वाधिक शक्तिमान देव आहे’ अशी कॉन्स्टंटीनची खातरी पटली अथवा पटवली गेली. चमत्कार असा झाला असे सांगितले जाते की मॅक्झेन्शिअसचे सैन्य टायबर नदीवरचा ‘नावांचा पूल’ फार घाईघाईने पार करत असताना तो पूल मध्येच तुटला. मॅक्झेन्शिअस स्वतः नदीत बुडून मरण पावला. ह्या युद्धाला ‘मिल्व्हियन पुलाचे युद्ध’ म्हणतात. ते सन 312 मध्ये झाले. कॉन्स्टंटीनने इटलीवर आपली सत्ता प्रस्थापित केली. आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव करण्यासाठी त्याला दहा वर्षे झगडावे लागले. त्यानंतर तो सम्राट झाला. जो जो प्रदेश तो जिंकत गेला त्या त्या प्रदेशातील ख्रिस्ती लोकांचा छळवाद संपत गेला व शेवटी जेव्हा तो सम्राट झाला तेव्हा सर्व साम्राज्यभर ख्रिस्ती धर्म हा सर्व धर्मांत लोकप्रिय झाला. ज्या नाझरेथकर येशूला रोमन सुभेदार पायलटने क्रूसावर देण्याची शिक्षा फर्मावली तोच येशू रोमन साम्राज्याचा तारक म्हणून त्यांचे आराध्यदैवत बनला. याचाच अर्थ असा की राजसत्ता या सोयीने धर्म संपविणे किंवा वाढविणे या गोष्टी कशा करू शकतात हे ख्रिस्ती धर्माच्या इतिहासावरून आपल्या लक्षात येईल. ख्रिस्ती धर्माची सत्तेवर येण्यासाठी अशी मदत झाल्यामुळे त्या धर्माकरिता कॉन्स्टंटीनने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या बरीच मदत केली. ख्रिस्ती धर्मगुरूंना त्याने खास सवलती दिल्या. उद्ध्वस्त केलेली ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे परत उभारण्यात त्याने आर्थिक सहाय्य केले. तसेच त्याने स्वतःही अनेक नवीन चर्चेस बांधली. कॉन्स्टँटिनोपलमधील सेंट सोफिया हे चर्चही त्यांपैकीच एक होय. त्याने केलेली ही प्रत्यक्ष मदत म्हणता येईल. अप्रत्यक्षरित्या त्याने केलेली मदत म्हणजे त्याने आपल्या साम्राज्याची राजधानी बदलली. रोमऐवजी कॉन्स्टँटिनोपल हे त्याने आपल्या राजधानीचे शहर केले. साम्राज्याचा कारभार चालविण्याच्या दृष्टीने हे शहर सर्वोत्कृष्ट होते. युरोप व आशियाला जोडणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आणि काळा समुद्र व इजीअन समुद्र यांना जोडणारा जलमार्ग ह्यांच्या नाक्यावर हे शहर आहे. राजधानी बदलल्यामुळे रोममध्ये सम्राटाचे वास्तव्य होत नव्हते. काही अंशी रोमच्या पोपलाच सम्राटाचा वारसदार समजण्यात येऊ लागले आणि त्यामुळे या काळात रोमन साम्राज्यविस्ताराऐवजी चर्चचे महत्त्व विशेष वाढीस लागले. राजसत्तेला जशी धर्मसत्तेची मदत होते तसेच धर्मसत्तेने आपले प्राबल्य वाढविण्यासाठी राजसत्तेचा असा फायदा करून घेतल्याचे आपल्या लक्षात येईल. कॉन्स्टंटीनला क्रूसाचे दर्शन झाले म्हणून केवळ त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला असे नाही तर भिन्न भिन्न प्रदेशांतील लोकांना एकत्र जोडेल अशा धर्माची त्याच्या साम्राज्यास फार गरज होती म्हणून त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला असे मानले जाते. (मराठी विश्वकोश) किंबहुना बायबलमधील येशू हा रोमन सत्तेविरूद्धचा असंतोष व्यक्त करताना दिसत नाही याचा अर्थ रोमन सत्तेनेच ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून राजसत्तेच्या प्रभावात तोवर प्रस्थापित झालेल्या बायबलमध्येच फेरफार करून राजकृपा संपादन करण्यात आली असा जो अर्थ लावला जातो तो खरा असावा या संशयाला बळकटी येते. जगातील कोणताही धर्मग्रंथ अविकृत नाही याची प्रचिती आपल्याला बायबलही देते. अर्थात हा झाला बायबलनुसार येणारा येशूच्या कार्याचा वृत्तांत व नंतरचा इतिहास पण त्यामागील तथ्यांचा इतिहास चक्रावून टाकेल एवढा वेगळा आहे. पहिली बाब म्हणजे येशूच्या जीवनातील हरवलेली वर्षे. येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील अज्ञात कालखंडाबाबत बिब्लिकल आणि अन्य अॅकॅडमिक संशोधकांत एक प्रकारचे अनावर कुतुहल आहे. त्यातूनच अनेक सिद्धांत जन्माला आलेले आहेत. येशूचा मृत्यू क्रॉसवर झाला की नाही याबाबतही अनेक विवाद उत्पन्न झालेले आहेत. येशूचा मृत्यू क्रॉसवर झाला नसेल तर मग त्यानंतर येशू कोठे गेला याबाबतही वेगवेगळ्या थिअरी मांडल्या गेल्या आहेत. त्यांना कल्पोपकल्पित म्हणून सहज उडवता येणे शक्य असले तरी त्यातील शक्याशक्यतांची तपासणी करणे आवश्यक आहे. नव्या करारानुसार येशू ख्रिस्ताचा जन्म इसपू सहामध्ये किंवा तीनमध्ये गॅलिलीमध्ये मेरी या कुमारीमातेच्या पोटी झाला. त्याचे पालन-पोषण जोसेफ नामक सुताराच्या घरी झाले. त्याची वय वर्ष बारापर्यंतचीच थोडीफार माहिती मिळते पण वय वर्ष बारा ते सत्तावीस या काळाबद्दल नवा करार मौन आहे. इतर विद्वानांच्या मते येशू या काळात सुतारकामच करत राहिला पण त्याचेही पुरावे संदिग्ध आणि ओढून-ताणून लावल्यासारखे वाटतात. उदाहणार्थ, मार्क-6.3 मधील विधान, ‘‘हा तो सुतार तर नव्हे ना?’’ या विधानावरून येशू त्या प्रांतात ओळखला जात असला पाहिजे अन्यथा अशी ओळख दाखवली गेली नसती पण ही ओळखही संदिग्ध आहे हे उघड आहे. यावरुन येशू त्याच प्रांतात स्थायिक होता हे सिद्ध होत नाही. वयाच्या 27 वर्षानंतरच त्याने धर्मोपदेश करायला सुरूवात केली. त्याआधी त्याने ज्ञानप्राप्तीसाठी कोठे प्रवासच केला नसेल असाही तर्क लावता येत नाही. सुतारकाम हा त्याच्या पित्याचा व्यवसायच होता. त्यामुळे त्याचाही सुतार म्हणून उल्लेख होत असणे स्वाभाविक मानले जाते. यामुळे अजून तर्कांना उधाण आले व येशूच्या हरवलेल्या वर्षांत नेमके काय झाले हे शोधण्याची एक स्पर्धाच सुरू झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चौथ्या-पाचव्या शतकात राजा ऑर्थरच्या काळातील अर्थुरियन दंतकथांत तरूण वयात येशू इंग्लंडमध्ये येऊन गेला होता आणि तो उत्कृष्ठ बांधकामतज्ज्ञ होता असे आपल्याला पहायला मिळते. येशूची आई विधवा झाल्यानंतर जोसेफने येशूला आपल्या पंखाखाली घेतले अशा काही दंतकथा सुचवतात. अर्थात या दंतकथा बायबलमधील कथांशी विसंगत आहेत. त्यामुळे पुढेही अनेक दावे होत राहिले. येशूच्या या हरवलेल्या वर्षांबाबत बाराव्या शतकात दावा केला गेला की येशू मृत्युनंतर पवित्र आत्म्याच्या स्वरूपात इंग्लंडमध्ये येऊन गेला होता पण हे झाले क्रॉसवरील मृत्युनंतर. या दाव्याला त्या काळात जरी अद्भूतरम्यतेच्या मोहात प्रसिद्धी मिळाली असली तरी या दाव्यावर विश्वास मात्र ठेवला गेलेला दिसत नाही. पण एकोणिसाव्या शतकात रेनेसांनंतर युरोपियन विद्वान बायबलवर अंधविश्वास न ठेवता या काळाबद्दल गांभिर्याने विचार करू लागले. कथा-कादंबरीकारांना आपली कल्पनाशक्ती स्वैर सोडता आली. त्यातून मजेशीर तर्क मांडले गेले. 1869 मध्ये लुईस जेकोलियट या लेखकाने कृष्ण आणि येशूत साम्य पाहिले आणि बायबल हे मुळचे नसून भारतीय पुराणकथांचा तो नवा अवतार आहे असा दावा केला. कृष्णकथा आणि येशूच्या कथेत त्याने अनेक साम्यस्थळे शोधली होती. भारत आणि येशू ख्रिस्ताची सांगड घालायला येथून सुरूवात झाली असे म्हटले तरी वावगे होणार नाही. पण सर्वात अधिक गाजला तो 1887 मधील निकोलस नोटोविच या युद्ध-पत्रकाराचा दावा. त्याने भारताला भेट दिली होती. काश्मीरमार्गे लडाखला गेल्यानंतर हर्मीस मठात त्याला म्हणे ‘लाईफ ऑफ सेंट इसा’ नामक तिबेटियन भाषेतील एक जुने हस्तलिखित मिळाले. इसा हे येशूचे अरेबिकमध्ये होणारे रुपांतर आहे हे सर्वांना माहितच आहे. नोटोविचने या हस्तलिखिताचा अनुवाद केला आणि 1894 मध्ये प्रथम फ्रेंचमध्ये प्रसिद्ध केला तर त्याचा अनुवाद भारतीय जैन विद्वान वीरचंद गांधी यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहून ‘अननोन लाईफ ऑफ जिजस क्राईस्ट’ या नावाने प्रसिद्ध केला. नोटोविचच्या पुस्तकाला प्रचंड प्रसिद्धी तर मिळाली पण ‘हे पुस्तक म्हणजे एक थापांचे पोतडे आहे’ असे टीकाकार उच्चरवात सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागले. वीरचंद गांधी हे बहुभाषिक आणि जैन धर्मासहित अनेक धर्मतत्त्वज्ञानाचे विद्वान होते. शिकागो येथे भरलेल्या पहिल्या धर्मसंसदेत त्यांची भाषणे गाजली. बायबलवर त्यांची हुकुमत होती. बायबलवर जैन व बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे हे त्यांनी ओळखलेच होते पण येशूपर्यंत ही धर्मतत्त्वे कशी पोहोचली या गुढाचे उत्तर त्यांना नोटोविचच्या पुस्तकात सापडले. यातील हस्तलिखिताच्या अनुवादातील माहितीत अनेक विसंगती अवश्य आहेत. असे असले तरी यातील माहितीनुसार येशू वयाच्या तेराव्या वर्षी तत्कालीन रिवाजानुसार आपल्या विवाहाच्या चर्चा सुरू होताहेत हे लक्षात आल्यानंतर घरातून सटकला आणि व्यापारी तांड्यासोबत सिंधकडे जायला निघाला. तेव्हा भारत, विशेषत: काश्मीर हे विविध धर्म-तत्त्वज्ञानांचे केंद्र होते. त्याने पुढे पंजाब ओलांडून जगन्नाथ पुरीपर्यंत प्रवास केला. जैन व बुद्धिस्ट विद्वानांशीही त्याने धर्मचर्चा केल्या. वेदांचा अभ्यास केला. त्याने ब्राह्मण व क्षत्रियांवर विषमतायुक्त वागणुकीसाठी प्रहार केले आणि वैश्य आणि शुद्रांत तो अधिक रमला आणि त्यांना समतेचा उपदेश करू लागला. मूर्तीपूजेलाही त्याने विरोध केला. यामुळे चिडलेल्या ब्राह्मण व क्षत्रियांनी येशूची हत्या करायचे ठरवले. येशूला शुद्रांकरवी ही माहिती मिळताच तो नेपाळमध्ये सटकला. तेथे पाली भाषेचा अभ्यास केला. बुद्धाचे तत्त्वज्ञान समजावून घेतले. मग हिमालयीन प्रदेशात (काश्मीर) काही काळ वास्तव्य केल्यानंतर तो पुन्हा परतीच्या वाटेला लागून पर्शियात आला. या सातव्या अध्यायापर्यंत जो भाग येतो त्यात बिब्लिकल विचारांची बीजे दिसतात. नंतरचा भाग तो इझ्राएलमध्ये गेल्यानंतर काय झाले ते त्याचे क्रुसिफिकेशन कसे झाले याचा वृत्तांत देतो. या नंतरच्या वृत्तांतामुळे नोटोविचवर लबाडीचा आरोप झाला. याचे कारण असे की भारतातून येशू निघून गेल्यानंतरचा वृत्तांत लडाखमध्ये लिहिल्या गेलेल्या हस्तलिखितात येणे शक्य नाही हे सर्वांचेच मत पडले. वीरचंद गांधींनी त्यांच्या प्रस्तावनेत बायबलमध्ये डोकावणार्या भारतीय तत्त्वज्ञानाबरोबरच भारतीय उपखंडातच आढळणार्या असंख्य भारतीय वृक्ष, पक्षी, धातूंचे वर्णन आधाराला घेतले आहे. भारत ते इजिप्तपर्यंत सिंधु काळापासून व्यापार होत होता. असंख्य व्यापारी तांडे या मार्गाने तर जातच पण समुद्र मार्गही वापरला जाई हे एक ऐतिहासिक वास्तव आहे. इझ्राएल आणि भारतात त्यामुळे अर्थातच पूर्वापार व्यापारी संबंध होतेच. एवढेच नव्हे तर बायबलमध्ये नव्या व जुन्या करारात बुद्धिस्ट, हिंदू व जैन तत्त्वज्ञानाची छाप दिसून येते. म्हणजेच खरे तर येशू नावाच्या व्यक्तिचे प्रत्यक्ष भारतात येणे आवश्यक नसून बायबलवरील प्रभाव हा व्यापारानिमित्त होणार्या सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे आहे असे मानणे अधिक संयुक्तिक राहील.महत्त्वाची बाब अशी की कॅथॉलिक विद्वानांनी येशूवर अन्य कोणाचाही प्रभाव असण्याची शक्यताच नाकारली असल्याने बायबलमधील बराच मूळ भाग एक तर संपादित केला आहे किंवा वगळला तरी आहे. डेड सी स्क्रोल्स सापडल्यानंतर या शंकेला बळकटी आली. आजचे बायबल पूर्ण नाही या दाव्यांना पुष्टी मिळाली. चर्चने अद्याप त्यांना अधिकृत मान्यता दिली नसली तरी ते लिखित स्वरुपात सापडल्याने विद्वत्जग चर्चच्या मान्यतेची अर्थातच पर्वा करत नाही. डेड सी स्क्रोल्समध्येही 13 ते 27 या गायब वर्षांत येशूने काय केले याचा वृत्तांत मिळत नाही हे विशेष. त्यामुळे येशू खरेच झाला नसून एक काल्पनिक पात्र उभे करून त्याला ‘मसीहा’ ठरवत वा घोषित करत त्याच्या गूढ अस्तित्वाभोवती व त्याच्या नावावर बनवल्या गेलेल्या तत्त्वज्ञानाभोवती तत्कालीन कारणांमुळे नवा धर्म स्थापित करण्यात आला अशी शंका निर्माण होऊ लागली. नोटोविच यांचे पुस्तकही त्यांनीच लिहिले आणि लडाखमध्ये सापडलेल्या मूळ हस्तलिखिताचा अनुवाद म्हणून केवळ प्रसिद्धी आणि धनाच्या आशेने खपवले हा त्यांच्यावर आरोप केला. त्यात अगदी मॅक्समुल्लरसारख्या विद्वानानेही आरोप केला होता हे लक्षात घेतले पाहिजे. येशूचा मृत्यू क्रॉसवर झाला नाही तर तो परत काश्मीरमध्ये आला व रोझबल येथे त्याची समाधी आहे असे मानणारा एक वर्गही आहे. त्यावर अनेक विद्वानांनी विस्तृत लेखनही केले आहे. म्हणजेच बायबलच्या बाहेरचेही येशूचे जीवन असले पाहिजे असे मानणारा वर्ग बराच काळ आधीपासून अस्तित्वात होता. याचे कारण म्हणजे बायबलमधील येशूचा येणारा वृत्तांत हा परिपूर्ण नाही आणि त्यामुळेच तो विश्वसनीयही नाही अशी भावना निर्माण होऊ लागलेली होती. अदृश्य वर्षांमध्ये व पुनरुत्थानानंतर नेमके काय झाले हे प्रश्न त्यातूनच उपस्थित होऊ लागले. पण हे झाले येशूच्या बायबलमधील येणार्या जीवनातील अदृश्य काळाबद्दल आणि त्या संदर्भातील विविध वदन्तांबद्दल. येशूला सुळावर चढवले हे वास्तव मानले तरी पुनरुत्थान आणि त्यानंतर येशूचे काय झाले हेही गूढ. शिवाय सुळी चढवल्या जाणार्या असंख्य व्यक्ती त्या काळात होत्या. ते सारेच गुन्हेगार असत असे नाही. बायबलमध्ये येशूच्या बालपणाबद्दल येणारी माहिती ही अद्भूतरम्य या सदराखाली टाकून देता येते. कुमारीमातेच्या पोटी जन्म ही त्यातलीच एक बाब. शिवाय वय वर्ष बारा पर्यंतची माहिती येते आणि नंतर थेट वय वर्ष सत्तावीसपर्यंत बायबल मौन पाळते हाही भाग शंकास्पद आहे. किंबहुना येशूची कथा रचण्यात आली आहे असा संशय बळकट व्हायला बायबल निमित्त देते. आज उपलब्ध असलेल्या बायबलला इसवी सनाच्या चौथ्या शतकात अंतिम रूप आले हे आपण वर पाहिलेले आहे. या प्रदीर्घ कालावधीत मूळ लेखन नेमके कधीचे आणि अंतिम स्वरूप देताना त्यात काय फरक केले गेले हे सर्वस्वी अज्ञात आहे. मुळात येशू खरेच झाला होता की नाही याबाबत शंका यावी या पद्धतीचाच हा अद्भूतरम्य इतिहास आहे. या अंगानेही आता संशोधन पुढे गेलेले आहे. अनेक समाजांनी आपापल्या धार्मिक व राजकीय स्वार्थांसाठी काल्पनिक पात्रांची निर्मिती करून, त्यांच्या भोवती अद्भूततेचे वलय निर्माण करून आपले हेतू पुढे रेटले असल्याचे आपल्या लक्षात येईल. भारतात चाणक्य हे असेच अनेकांपैकी एक पात्र आहे हे मी पूर्वी दाखवलेच आहे. येथे आपण आता येशू खरेच झाला होता की नाही या मुख्य मुद्द्यावर आता चर्चा करूयात. येशूच्या जीवनातील अखेरची तीन वर्ष बायबलमध्ये ग्रंथित झाली असून त्यातही वेगवेगळ्या वृत्तांतात साधर्म्य नाही. ‘बायबल’ हा शब्द ‘बिब्लीया’ या ग्रीक शब्दापासून साधला गेलेला असून त्याचा अर्थ होतो पुस्तके. बायबल हे अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. बायबलमध्ये जुना करार आणि नवा करार हे दोन भाग आहेत. जुना करार हा ज्यू लोकांचा पवित्र धर्मग्रंथ असून ख्रिस्ती मात्र दोन्ही पुस्तकांना मानतात. बायबल हे प्रत्यक्ष देवाने लिहिले आहे अशी एक श्रद्धा आहे. नव्या कराराच्या मूलस्रोतात 4 शुभवर्तमाने, लूकलिखित धर्मदूतांची (अपॉस्टल्स) कृत्ये, धर्मदूतांनी लिहिलेली 21 पत्रे आणि योहानकृत प्रकटीकरण अशी एकूण 27 पुस्तके असून ती सर्व मूळ ग्रीक भाषेत आहेत. नव्या कराराचे मूलस्रोतही काळाच्या ओघात पूर्ण झाले. इ.स.च्या सुमारे 150 मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘मूराटोरियन’ मूलस्रोतात हिब्रू लोकांस पत्र, याकोबाचे पत्र, पीटरचे पहिले आणि दुसरे पत्र आणि योहानचे एक पत्र अशा पाच पत्रांशिवाय सर्व पुस्तकांचा समावेश आहे. अलेक्झांड्रियाच्या थनेशिअसजवळ इ.स. 367 मध्ये पहिला व पूर्ण असा मूलस्रोत आढळला. ख्रिस्ती लोकांनी बायबल म्हणून कोणते लेखन स्वीकारावे यासंबंधीचा अंतिम निर्णय ख्रिस्ती चर्चच्या धर्माधिकार्यांनी घेतला असे नव्या कराराच्या मूलस्रोतरचनेवरून दिसते. (मराठी विश्वकोश) आजचे बायबल हे चर्चप्रणीत असून चर्च राजसत्तेवरही प्रभाव टाकून असल्याने बायबलच्या अंतिम रचनेवरही त्यांनीच प्रभुत्व गाजवले असे मानले जाते. थोडक्यात आज उपलब्ध असलेले बायबल हे येशूच्या कथित काळानंतर चारशे वर्षांनी अस्तित्वात आले आणि त्याचे मूळ काय होते हे केवळ चर्चलाच माहीत आहे आणि गुप्ततेबाबत रोमन चर्च किती प्रसिद्ध आहे हे सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे येशूच्या जीवनाचा, तो खरेच झाला आहे अथवा नाही, त्याच्या अस्तित्वाचा समकालीन पुरावा अन्य कोणत्या साधनांतून मिळतो काय याचा शोध संशोधकांनी घ्यायला सुरूवात केली असता अनेक विलक्षण गोष्टी उजेडात आल्या आणि त्या येशूच्या जीवनातील गायब वर्षांपेक्षा धक्कादायक होत्या. मुळात बायबलमध्ये येणारे वृत्तांत लिहिणारे कोणीही येशूच्या प्रत्यक्ष जीवनाचे साक्षीदार नव्हते. योहानचे शुभवर्तमान हे येशूच्या जीवनाच्या आणि बोधवाक्यांच्या प्रत्यक्ष साक्षीचे वृत्त आहे परंतु येशूचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर सुमारे साठ वर्षांच्या चिंतनानंतर योहानने ते लिहिले असे मानले जाते. पहिल्या तीन शुभवर्तमानांनंतर पहिल्या शतकाच्या अखेरच्या काळातच हे शुभवर्तमान लिहिलेले आहे. ही शुभवर्तमाने चरित्रात्मक रूपाने मात्र लिहिली गेलेली नाहीत. येशूला क्रूसावर दिल्यानंतर त्याचे पुनरुत्थान होऊन तो शिष्यांसमोर प्रत्यक्ष जेव्हा प्रकट झाला तेव्हा त्याच्या शिष्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आणि त्याला त्यांनी आपला प्रभू म्हणून नव्याने ओळखले आणि त्यांनी त्यानंतर येशूसंबंधीच्या घटना लिहिल्या. या उद्धारकाच्या जीवनाची सुवार्ता वा शुभवर्तमान घोषित करणे हा त्यांचा हेतू होता असे मानले जाते. ही सुमारे चारशे वर्षांनंतर प्रमाणित केली गेलेली शुभवर्तमाने प्रामाणिक आणि ऐतिहासिक आहेत असा दावा आधुनिक युगात हास्यास्पद ठरेल. येशूचा समकालीन रोमन अथवा ज्यू साधनात कसलाही उल्लेख येत नाही. बायबलही फार नंतर आजच्या स्वरूपात पोहोचले असल्यामुळे आणि सर्व शुभवर्तमानने येशूच्या कथित पुनरूत्थानानंतर अनेक दशकानंतर लिहिली गेलेली आहेत. त्यामुळे येशूचा एकही समकालिन उल्लेख अस्तित्वात नसल्याचे आपल्याला दिसून येते. ख्रिस्ती साधनांव्यतीरिक्त येशू ख्रिस्ताबद्दलचा पहिला उल्लेख फ्लेवियस जोसेफस या ज्यू इतिहासकाराने सन 93-94 या काळात लिहिलेल्या ‘Antiquities of the Jews‘ या ग्रंथात अवघ्या दोन परिच्छेदात दोन वेगळ्या प्रकरणात आणि तोही अत्यंत विसंगत पद्धतीने येतो पण या उल्लेखांचा वापर ख्रिस्ती इतिहासकारांनी येशूचे ऐतिहासिक अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केला. पुस्तकाच्या परीशीलनानंतर आणि उल्लेखांबद्दलची चिकित्सा केल्यानंतर खालील बाबी स्पष्ट होतात. 1. या ग्रंथात अठराव्या पुस्तकातील तिसर्या प्रकरणात येशूची क्रूसावर हत्या केल्याचे नमूद केले आहे. जोसेफसच्या हकीकतीचा आणि भाषाशैलीचा जो प्रवाह आहे त्यात अत्यंत विसंगतपणाने ठिगळ लावल्यासारखी ही माहिती तर येतेच पण ज्यू इतिहासकाराला, विशेषत: जोसेफसने येशूला ‘मसीहा’ या मूळ हिब्रू शब्दाऐवजी ‘ख्रिस्तोज’ हे ग्रीक भाषांतर वापरले आहे. ख्रिस्तोजवरूनच ख्रिस्ती धर्मनाम आले आहे. असे असले तरी तो भाषांतरित शब्द आहे आणि तत्कालीन ज्यू इतिहासकार हा शब्द वापरण्याची शक्यता नाही असे मत एडी पॉल आणि ग्रेगोरीसारख्या विद्वानांनी स्पष्ट नमूद केले आहे. शिवाय अस्थानी ही माहिती आलेली असल्याने ते नंतरच्या ख्रिस्ती धर्माधिकार्यांनी ख्रिस्ताचे ऐतिहासिकत्व सिद्ध करण्यासाठी केलेली घालघुसड आहे, अशी माहिती त्या ठिकाणी कसलाही आगापिछा नसताना आली असल्याने सिद्ध होते, असेही विद्वानांचे मत आहे. 2. याच ग्रंथात येशूला बाप्तिस्मा देणार्या जॉन द बाप्टिस्टची माहिती येते ती विसाव्या पुस्तकातील नवव्या प्रकरणात. येशूचा भाऊ जेम्सबाबतही येथे उल्लेख आलेला आहे. म्हणजे कालक्रमाचीही उलटापालट या ग्रंथात झालेली आहे. खरे तर येशूच्या बाप्तीस्म्याची माहिती आधी आणि क्रुसिफिकेशनची नंतर असा क्रम असायला हवा होता. त्यामुळे ही सुद्धा माहिती नंतर केली गेलेली घालघुसड आहे, हे स्पष्ट होते. शिवाय जोसेफसच्या अन्य इतिहासविषयक ग्रंथांत मात्र कोठेही येशूचा नामोल्लेखही नाही. त्यामुळे मुळात ही माहिती जोसेफसची असू शकत नाही असेही म्हटले जाते. साहित्य-इतिहासात प्रक्षेप करणे ही एक जागतिक प्रवृत्ती आहे हे येथेही सिद्ध होते. थोडक्यात जोसेफसच्या ग्रंथात येणारे येशूचे उल्लेख हे प्रक्षिप्त आहेत आणि त्यामुळे येशू खरेच झाला होता हे सिद्ध व्हायला कसलीही मदत होत नाही. Christian forgery in Jewish Antiquities : Josephus Interupted या Nicholas Peter Legh Allen लिखित ख्रिस्ताचा अन्यत्रच्या उल्लेखांबद्दल आणि त्यांच्या ऐतिहासिकत्वाबद्दल विस्तृत चर्चा केली आहे आणि ख्रिस्ती विद्वानांनी नंतर जोसेफसच्या ग्रंथात प्रक्षेप करून ख्रिस्त खरेच ऐतिहासिक व्यक्ती होती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे हे दाखवून दिले आहे. येशू ख्रिस्ताचा दुसरा उल्लेख येतो तो रोमन इतिहासकार आणि सांसद टॅसिटस याने लिहिलेल्या सन 116 मधील अॅनाल्स (अपपरश्री) या ग्रंथातील पंधराव्या पुस्तकातील 44व्या प्रकरणात केलेला आहे.‘ख्रिश्चन ज्याला ख्रिस्त म्हणतात त्याला सम्राट टायबेरीयसच्या काळात पाँटीयस पायलटने कठोर शिक्षा दिली,’ असा तो उल्लेख आहे. टॅसिटसने हा ग्रंथ लिहिला तेव्हा ख्रिस्ती धर्म अल्प प्रमाणात का होईना रोमन साम्राज्यात पसरलेला होता आणि ख्रिस्ताबाबतच्या बर्याच कथा तोवर आकाराला आल्या होत्या. अनेक इतिहासकारांचे मत आहे की त्या प्रचलित होऊ लागलेल्या कथांचा टॅसिटसवर प्रभाव होता व त्यातूनच त्याने हा ओझरता उल्लेख केला आहे कारण त्याने या माहितीचे संदर्भ कोठेही दिलेले नाहीत. शिवाय त्या काळात रोमन ख्रिश्चनांचा द्वेष आणि छळवाद करत असताना एक रोमन इतिहासकार आणि सांसद टॅसिटस येशूला ख्रिस्त (मसीहा) अशी संज्ञा वापरणे शक्य नाही. चार्ल्स गुइंबेर्ट म्हणतात की टॅसिटस फक्त ख्रिश्चन काय समजतात तो विश्वास पुनर्उद्धृत करत आहे, त्यात ऐतिहासिकत्व नाही. स्युटोनियस या रोमन इतिहासकारानेही आपल्या सन 121 मध्ये लिहिलेल्या Lives of the tweleve Caesars या ग्रंथात ख्रिश्चनांच्या नेत्याचा ‘ख्रिस्तस’ असा उल्लेख केला आहे. तो येशूचा नामोल्लेख करत नाही. शिवाय या संदर्भात ख्रिश्चनांच्या बंडाळीचा जो उल्लेख आहे ती घटना घडली होती ती सन 49-50 च्या काळात. त्यावेळेस प्रत्यक्ष येशूचा मानवी काळ होऊन गेलेला होता. त्यामुळे ख्रिश्चनांचा नेता ख्रिस्तस म्हणून जो उल्लेख आला आहे तो येशूबाबतचा नाही, याबाबत संशोधकांचे एकमत आहे. यावरून एक गोष्ट दिसून येते ती अशी की जर येशू ख्रिस्त ऐतिहासिक व्यक्ती आहे हे सिद्ध करण्यासाठी जर अन्य ऐतिहासिक ग्रंथामध्ये प्रक्षेप करण्याची गरज ख्रिस्ती धर्मगुरूंना पडली असेल तर मग मुळात येशूच ऐतिहासिक व्यक्ती आहे की नाही ही शंका निर्माण होणारच. शिवाय रोमन सम्राटानेच ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे रोमन इतिहास ग्रंथात ख्रिस्ती धर्मगुरूंना प्रक्षेप करता येणे सहज शक्य होते, असे यावरून आपण स्पष्ट म्हणू शकतो. सन 70 ते 200 या काळातील बॅबिलोनियन ‘ताल्मूद’ या ग्रंथातही येशू हे नाव येते पण ते येशू ख्रिस्ताशीच संबंधित असल्याचे निश्चित नाही. याशिवायही उत्तरकालीन अनेक ग्रंथांत येशू ख्रिस्ताचे नाव आले आहे पण त्याचीही ऐतिहासिकता संशयास्पद आहे कारण रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर आणि बायबलची रचना पूर्ण झाल्यानंतर येशूची माहिती सर्वदूर पसरलेली होती. त्यामुळे जे उल्लेख आले आहेत ते बायबलच्या प्रभावाखालील आहेत असे मानले जाते आणि ते संयुक्तिकही आहे. पुरातत्वीयदृष्ट्या पाहिले तर तसेही पुरावे येशूबाबत मिळालेले नाहीत. थोडक्यात आपल्याला येशूच्या जीवनाची (तीही मधली वर्षे वगळून) जी माहिती मिळते ती शुभवर्तमानातून. त्यातही कमी-अधिक फरकाने विसंगती आहेत. उदाहणार्थ जॉनच्या शुभवर्तमानात आणि अन्य शुभवर्तमानात तपशीलात बराच फरक आहे. येशूला वल्हंडनच्या दिवशी नव्हे तर आदल्याच दिवशी क्रूसावर चढवले अशी माहिती जॉन देतो. ती इतर शुभवर्तमानातील माहितीशी विसंगत आहे. प्रेषितांची कृत्ये आणि ल्युकचे शुभवर्तमान ही बायबलमधील दोन्ही पुस्तके एकाच व्यक्तिने लिहिलेली आहेत हे स्पष्ट असल्याने त्यांचीही ऐतिहासिकता संशयास्पद आहे असे मत जोएल ग्रीन यांनी Dictionery of the Jejus and the Gospel या ग्रंथात व्यक्त केले आहे. म्हणजे प्रथम येशूच्या जीवनातील गायब असलेल्या वर्षांपासून सुरूवात झालेल्या शोधाचा शेवट ‘येशू प्रत्यक्षात झालाच नाही’ या मतापर्यंत कसा झाला याचा आपण येथे थोडक्यात आढावा घेतला आहे. जोसेफसच्या पुस्तकात प्रक्षेप केल्याने रोमन चर्चला काहीतरी दडवायचे होते हे सिद्ध होते. रोमन सम्राटानेच नंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याने अगदी टॅसिटससारख्या रोमन इतिहासकाराच्या लेखनातही प्रक्षेप करता येणे चर्चला सहज शक्य होते आणि ते तसेच झाले असावे हे वरील माहिती पाहता लक्षात येते. येशूच्या अस्तित्वाचा पुरावा येशूच्या समकालीन एकाही साधनात अगदी बायबलमध्येही मिळत नाही हे आपण पाहिले. तरीही येशू ख्रिस्ताभोवती जगातील एक अवाढव्य धर्म उभा राहिला हेही एक वास्तव आहे. एका काल्पनिक व्यक्तिभोवती आणि त्याच्या कल्पित शिकवणीभोवती असा धर्म कसा स्थापित होईल असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक असले तरी जागतिक इतिहासात पाहिले तर ते अगदी शक्य आहे हे आपल्या लक्षात येईल. नव्या श्रद्धांच्या शोधातील व्यक्ती जेथे देवतांची नवनिर्मिती करू शकतात तर एखाद्या प्रेषिताची निर्मिती काय अशक्य आहे? इतिहासातील काही व्यक्तित्वे आणि त्यांच्या जीवनातील काही काल्पनिक तर काही सत्य अशा घटनांचे मिश्रण करून एक नवी व्यक्ती अथवा प्रेषित घडवता येणे अशक्य नव्हते. कदाचित ती या तथाकथित शिष्यांची अथवा प्रस्तापित धर्मसत्तेला आव्हान देऊ पाहणार्या समाजाची गरज असू शकते. रोमन सम्राटाने हा धर्म स्वीकारला त्यामागेही राजकीय कारणे आहेत हेही स्पष्ट आहे आणि कोणताही धर्म राजसत्तेच्या पाठिंब्याखेरीज टिकू शकत नाही हा जागतिक इतिहास असल्यामुळे अनेक धर्मांनी राजसत्तेच्या सोयीनुसार आपल्या मूळ धर्मतत्त्वात फेरफार केल्याचे आपल्याला दिसून येईल.

ख्रिस्ती धर्माच्या निर्मितीचे श्रेय बायबल येशूलाही देत नाही. ही निर्मिती केली ती शुभवर्तमाने लिहिणार्या शिष्यांनी. त्या वर्तमानातही रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्म स्वीकारेपर्यंत काय बदल करण्यात आले हेही आपल्याला माहीत नाही. राजसत्ता ही नेहमी अनुकूल धर्मसत्तेला जवळ घेत आपला प्रवास सुलभ करत असायच्या हा जागतिक इतिहास आहे. राजसत्तेला आकृष्ट करण्यासाठी धर्मनेते किती क्लृप्त्या लढवत असत हे आपल्याला भारतीय धर्मांच्या इतिहासावरुनही समजू शकते. बौद्ध, जैन, हिंदू आणि वैदिक धर्मांत वेळोवेळी फरक पडत गेलेला दिसतो त्यामागे तत्कालीन राजसत्ता आणि धर्मसत्तांची गरज होती हेही स्पष्ट आहे. जैन आणि बौद्ध धर्मसंगती नेमक्या कोणत्या राजवटींच्या काळात भरवल्या गेल्या आणि धर्मतत्त्वे नव्याने ठरवून निश्चित करण्यात आली आणि गुप्तांनी वैदिक धर्माला का राजाश्रय दिला हा इतिहास अभ्यासला तर येशूच्या निर्मितीमागील रहस्यही उलगडायला, समजावून घ्यायला मदत होईल हे निश्चित. कुराण आणि हदीसमध्ये खलिफांच्या सोयीसाठी मुस्लिम धर्मगुरूंनी काय काय बदल केले याचा सुद्धा अभ्यास होणे म्हणूनच गरजेचे आहे. मुळात धर्मनिर्मितीची आणि प्रेषितांची निर्मिती ही गूढ समाजमानसशास्त्रीय प्रक्रिया आहे आणि येशूची कुमारीमातेपासून झालेली जन्मकहाणी ते क्रुसिफिकेशन आणि पुनरुत्थान ही पुराकथात्मक दैवी मांडणी त्याचाच परिपाक आहे असे म्हणता येते. वरील सर्व मते पाहिल्यावरचे माझे मत असे आहे की येशू मसीहा ही व्यक्ती ऐतिहासिक नाही तर ती जाणीवपूर्वक तयार करण्यात आली आहे. त्याचे तत्त्वज्ञान हे पौर्वात्य आणि मध्यपूर्वेतील उदारमतवादी तत्त्वज्ञानाचे मिश्रण करत बनवण्यात आले व ‘बायबल’ला अंतिम स्वरूप येईपर्यंत त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले आणि त्यातून आजचे रूप साकार झाले. येशू ही व्यक्ती ऐतिहासिक वाटावी यासाठी अन्य इतिहासग्रंथांत सुद्धा प्रक्षेप करण्यात आले. श्रद्धाळू व्यक्तिंवर व तत्त्वज्ञांवरही येशूच्या दयामय शिकवणुकीचा अमिट प्रभाव आहे हे सत्यच आहे पण त्याच वेळेस ती ऐतिहासिक व्यक्ती होती काय हा प्रश्न उपस्थित केला तर मात्र पंचाईत होऊन जाते ती अशी. प्रत्यक्षात न झालेल्या व्यक्तिही आर्य चाणक्याप्रमाणे कशा निर्माण केल्या जातात आणि लोकांना त्या ऐतिहासिक वाटू लागतात याचे हे जागतिक पातळीवरचे आदर्श उदाहरण आहे. -संजय सोनवणी मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021 पान क्र. 30 ‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क - 7057292092
.jpg)







Comments