संपादकीय : केवळ मताधिक्याची उत्सुकता
- Apr 11
- 3 min read
ज्येष्ठ नेते शरद पवार हे 1967 साली प्रथम बाराममी विधानसभा
मतदारसंघातून निवडून आले. सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर 1991 मध्ये हा मतदारसंघ प्रथम अजितदादा पवारांकडे आला आणि आठ वेळा बारामतीकरांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले. म्हणजे 1967 पासून सलग हा मतदारसंघ पवार कुटुंबीयांच्या ताब्यात आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या मैदानात असून त्यांच्या केवळ मताधिक्याची उत्सुकता आहे. काँग्रेसच्या उमेदवारानेही इथून माघार घेतली असल्याने अजितदादांच्या मताधिक्याचाही विक्रम सुनेत्रावहिनी मोडतील, असे चित्र आहे.
दादांच्या निधनाच्या चौथ्याच दिवशी सुनेत्रावहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्या धीरोदात्तपणाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. लगेचच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय चर्चेला आला. शरद पवार यांनी आटापिटा करूनही ते साध्य न झाल्याने त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा आक्रस्ताळेपणा अनुभवास आला. रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी जी विधाने केली ती त्यांचे वैफल्य दाखवून देणारी होती.
काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी सुनेत्रावहिनींच्या विरूद्ध अर्ज दाखल केला होता. ‘मरेपर्यंत राजकारण’ हे धोरण असलेल्या थोरल्या साहेबांनी नेहमीप्रमाणे वेळ न दडवता सांगितले की, काँग्रेसला तिथून निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत समोर विरोधी उमेदवार असणारच, हेही सांगायला ते विसरले नाहीत. ‘बारामतीत मतदानासाठी येईन’, असे सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले. त्याचवेळी मोरे यांनी मागणी केली की, अजित पवार यांच्या मृत्युची चौकशी करण्यासाठी गुन्हा दाखल करा तरच मी माघार घेतो. ‘त्यांना निवडणूक लडढण्याचा अधिकार आहे,’ असे सांगणाऱ्या पवारांनी ‘मल्लीकार्जून खर्गे यांना फोन केला आणि मोरे यांनी उमेदवारी
माघार घेतली’ असे सांगितले गेले. मुळात बारामतीत काँग्रेसचे वेगळे असे काही अस्तित्वच नाही. मग त्यांनी इतकी उठाठेव का केली? हे कळायला मार्ग नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस संपविल्याचा आक्षेप अनेक जण घेतात. बारामतीत नेमकी माघार का घेतली हे हर्षवर्धन सपकाळच सांगू शकतील. आता करूणा मुंडे, अभिजित बिचुकले असे काही उमेवार त्यांच्या विरूद्ध असले तरी त्याने फार काही फरक पडेल असे वाटत नाही.
अजितदादांचे निधन हा महाराष्ट्रावरील आघात होता. त्यांना ओळखणाऱ्या आणि ओळख नसलेल्यांच्याही डोळ्यात पाणी होते. त्यांच्या विषयी अनेकांची मतमतांतरे असली तरी असे धडाकेबाज नेतृत्व तयार व्हायला काही दशके जावी लागतात हे सत्य सर्वांना दिसत होते. या पार्श्वभूमीवर सुनेत्रावहिनींनी उपमुख्यमंत्री होणे हा नैसर्गिक न्याय होता. तो अंमलात आल्याने या दुःखातही काही लाभ होतात का, याचे ठोकताळे पडताळून पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. पुढील काळातील त्यांचे वागणे, बोलणे आणि एकंदरीतच देहबोली पाहता अनेकांच्या ते ध्यानात आले.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुरूवातीला सुनेत्रा पवार यांच्या विरूद्ध उमेदवारी अर्ज भरला. इथून धनगर मताचे राजकारण होईल असे आखाडे बांधले गेले. सुनेत्रावहिनींच्या विरुद्ध काही कारस्थान होईल का? या विषयीचीही चर्चा रंगू लागली. ‘दादांच्या निधनानंतर त्या चौथ्या दिवशी शपथ घेऊ शकतात तर आम्ही निवडणूक का लढवू नये?’ असा हाके यांचा प्रश्न होता. त्यांना माघार घ्यायला लावण्यात संबंधितांना यश आले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असेच सर्वांना वाटत होते पण काहींनी अर्ज भरलेच. लोकशाहीत भावनेच्या बळावर राजकारण होत नाही, लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहेच, हे तर खेरच! पण इथे फक्त भावना नव्हत्या. अजितदादा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बारामतीसाठी आणि अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रासाठी काय काय केले हे पाहिले तर कुणीही अचंबित होईल. आपल्या रांगड्या शैलीमुळे त्यांचा प्रशासनावर जो वचक होता तसा आता कुणाचाही नाही. स्पष्टवक्तेपणा आणि समोरच्याशी थेट संवाद यामुळे त्यांची कार्यशैली अनेकांना लुभावणारी होती.
लोकनेते अशी ओळख असलेल्या अजितदादांच्या निधनानंतर इथे घराणेशाही हा विषय मागे पडतो. पवार कुटुंबीयांचे बारामतीच्या विकासातील योगदान निर्विवाद आहे. त्यात सुनेत्रा पवार यांनी सुरूवातीपासून सर्वांशी स्नेहबंध जपला आहे. काटेवाडी गावाचेही त्यांनी आमूलाग्र परिवर्तन घडविले आहे. एकेकाळी शरद पवार
यांची सावली अशी ओळख असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांची बहीण असल्याने बालपणापासूनच त्यांना राजकारणाची आणि त्यातील डावपेचांगची ओळख आहे. ंत्यांचे पर्यावरणविषयक कामही मोठे आहे. अजितदादांच्या पाठिशी सावली बनून राहिलेल्या सुनेत्रावहिनींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुराही हाती घेतली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात त्या त्यांचे अस्तित्व सिद्ध करतील, हे नक्की.
अजितदादा 2019च्या निवडणुकीत 1 लाख 65 हजार 265 मतांनी निवडून आले होते. आठपैकी तीन निवडणुकीत त्यांनी एक लाखाहून अधिक मताधिक्य घेत विजय मिळवला. आजच्या घडीला सुनेत्रावहिनी त्यांचा विक्रम मोडून अनेकांना ‘चपराक’ देतील, असे चित्र आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ही रणरागिणी पूर्ण क्षमतेने भरीव योगदान देईल, यासाठी त्यांना शुभेच्छा!
घनश्याम पाटील
70572922092
प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक (१३ ते १९ एप्रिल २०२६)
.jpg)



Comments