परीक्षा - परीक्षा आणि पेपरफुटीचं दुष्टचक्र
- 19 minutes ago
- 9 min read
परीक्षा म्हणजे एखाद्या व्यक्तिच्या भावात्मक, ज्ञानात्मक, क्रियात्मक योग्यतेचे, कौशल्याचे, आकलनाचे मूल्यमापन करणे. परीक्षा ह्या तोंडी, लेखी आणि प्रात्यक्षिक अशा स्वरूपाच्या असतात. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या योग्यतेची क्षमता तपासली जाते. त्यात प्रामुख्याने तीन शक्यता तपासल्या जातात.
मूल्यांकन : एखाद्या विद्यार्थ्याने जे काही शिकले त्याचे त्याला कितपत आकलन झाले? हे तपासणे.
पात्रता : एखाद्या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी किंवा व्यावसायिक पदासाठी तो किती पात्र आहे, हे निश्चित करणे.
सुधारणा : त्यात जर काही कमतरता आढळल्यास त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे.
म्हणजेच परीक्षा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे मानण्यास हरकत नाही. किंबहुना आपल्या जीवनात पाऊला-पाऊलावर आपल्याला अनेक कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते. मग ती परीक्षा शालेय, महाविद्यालयीन परीक्षा असो वा जीवनाची परीक्षा असो. त्याची सुरूवात शाळेत गेल्यापासूनच होत असते.
आमच्या काळात तीमाही, सहामाही, नऊमाही आणि वार्षिक अशा परीक्षा घेतल्या जात होत्या. त्या काळात त्या विद्यार्थ्याला जे काही शिकवले गेले, त्याचे त्याला कितपत आकलन झाले आहे? त्याने ते कितपत ग्रहण केले आहे? ह्याचे मूल्यमापन ह्या परीक्षांमधून केले जात असे अन् मगच पुढचा अभ्यासक्रम त्याला शिकवला जात असे.
त्यानंतर त्याचे स्वरुप बदलून ह्याच परीक्षा चौमाही, आठमाही आणि बारमाही म्हणजेच वार्षिक असे करण्यात आले कारण प्रत्येक तीन महिन्यांनी अशा परीक्षा घेणे, पेपर सेट करणे, ते तपासणे ह्यामध्ये कदाचित वेळेचा अपव्यय होत असावा किंवा विद्यार्थ्यांवर सातत्याने परीक्षांचे दडपण येत असेल म्हणून हे बदल करण्यात आले असावे. तरीही प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्याला अशा टेस्ट आजही घेण्यात येत आहेत. उद्देश एकच, विद्यार्थ्याला शिकवलेल्या विषयाचे किती आकलन झाले? याचा आढावा घेणे.
अर्थात त्यामुळे जरी विद्यार्थी वर्षभर त्यात व्यग्र राहू लागला असला तरी तो अपडेट राहत होता. शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी सातत्याने करत असे आणि एकदा का तो विषय पक्का झाला की, तो त्याच्या स्मरणात राहत असे आणि पुढील अभ्यासक्रम शिकण्यास तो तत्पर होत असे.
ह्याच परीक्षा देऊन पुढे तो आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून जीवनाची लढाई लढायला सुरूवात करत असे. त्यांचे मूल्यांकन झाल्यावर त्याची पात्रता निश्चित होत असे आणि त्याच निकषावर त्याला नोकरी किंवा व्यवसाय करण्यास पुढील मार्ग मोकळा होत असे.
अर्थात येथे देखील त्याची परीक्षा संपलेली नसतेच. आपल्या कार्यालयात देखील त्याला वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने येत असत. त्या आव्हानांना तोंड देणे क्रमप्राप्त असे. ही देखील एकप्रकारची परीक्षाच असे. शिवाय दिवसेंदिवस जे काही संशोधन होऊन नवनवीन आविष्कार होत असत त्याच्याशी ताळमेळ साधून, त्या नॉलेजचा उपयोग करून त्याला आपली पात्रता सिद्ध करावी लागत असे. अगदी नोकरीच्या ठिकाणी सुद्धा त्याला वेगवेगळ्या विषयाशी संबंधित परीक्षा देऊन स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे होते अन् आजही तसेच चित्र सर्वत्र दिसते. अगदी आय. टी. क्षेत्र म्हणू नका, शैक्षणिक क्षेत्र म्हणू नका, बँकिंग क्षेत्र म्हणू नका, संगणक क्षेत्र म्हणू नका, त्यातही जे काही नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे, ते शिकणे आवश्यक झाले आहे. स्पर्धेच्या या युगात ज्याने ह्या तंत्राचा स्वीकार केला, तो पुढे जाता पुढच्या पदावर पोहोचतो आणि जो शिकला नाही तो मागे पडतो कारण तो ज्या ठिकाणी नोकरी किंवा व्यवसाय करतो, त्याचा त्याच्या कंपनीला अधिक फायदा होत असतो आणि असेच कर्मचारी कंपनीला हवे असतात. त्यामुळे त्याच्या कंपनीची, व्यवसायाची वृद्धी, प्रगती होत जाते आणि त्याची स्वतःची देखील प्रगती आणि विकास होत जातो.
आता शालेय परीक्षा असो वा महाविद्यालयीन परीक्षा असोत. जे विद्यार्थी मन लावून परीक्षेत पास व्हायचे या उद्देशाने अभ्यास करत असत त्यांना परीक्षेत कॉपी करण्याची गरज पडत नसे. ते मेहनत करून अव्वल दर्जाचे यश परीक्षेत मिळवत असत पण काही उडान टप्पू वृत्तीचे विद्यार्थी, ज्यांना अभ्यासात किंवा आपले करिअर घडविण्यात अजिबात रस नसे केवळ आपल्या पदरी एखादी तरी डिग्री असावी ह्या उद्देशाने ते परीक्षा देत असत ते मात्र परीक्षेत कॉपी करत असत. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी परीक्षा कक्षात पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात येत असे. एखादा विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला तर त्याची उत्तरपत्रिका हिसाकावून घेतली जात असे आणि त्याला परीक्षा कक्षाच्या बाहेर हाकलून देण्यात येत असे. नियम मोडला म्हणून त्यावर आवश्यक ती कारवाई देखील करण्यात येत असे. त्यामुळे त्यावेळी सहसा असे धाडस कोणीच विद्यार्थी करत नसत कारण त्यांच्यात प्रामाणिकपणा हे संस्कार देखील झालेले असत. एवढेच काय पण आमच्यावेळी आम्हाला बाजारात उपलब्ध असलेले गाईड देखील वापरण्यास बंदी होती. एखादेवेळी गाईडमध्ये जी उत्तरे लिहिलेली असत, तशाप्रकारची उत्तरे जर उत्तरपत्रिकेत आढळली तर त्या उत्तराला शून्य मार्क देण्यात येत असे पण इतर काही राज्यात मात्र मस्तवाल असलेले मोठ्या नेत्यांचे किंवा प्रतिष्ठित लोकांचे पाल्य आपल्या वडिलांच्या प्रतिष्ठेचा, त्यांच्या दबदब्याचा वापर करून चक्क शिक्षक किंवा पर्यवेक्षकावर दबाव आणून परीक्षेत पुस्तके आणून त्यात पाहून उत्तरे लिहित असत. काही ठिकाणी तर असे गुंड प्रवृत्तीचे विद्यार्थी बेंचवर चाकू ठेवून परीक्षा देत असत. आता बिचारे शिक्षक काय करणार? इकडे त्यांना विद्यार्थ्यांची भीती आणि तिकडे त्यांच्या मान्यवर असलेल्या वडिलांची दहशत! त्यामुळे कदाचित त्यांची नोकरी सुद्धा धोक्यात येत असे. म्हणून आपल्या डोळ्यासमोर हा अन्याय होत असताना सुद्धा जिवाच्या भीतीने ते गप्प बसत असत आणि हे सर्व अलीकडेच होत आहे असे नाही तर फार पूर्वीपासून हे होत आले आहे.
त्यावर मध्यंतरी एक उपाय काढण्यात आला होता. अशा उनाड आणि अभ्यास न केलेल्या विद्यार्थ्यांना चक्क त्या विषयाची पुस्तके परीक्षा असताना देण्यात येत होती कारण ज्यांनी अभ्यासच केला नाही, पुस्तकच हातात धरले नाही त्यांच्यासमोर पुस्तक ठेवले तरी त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यातच त्याचा वेळ निघून जात असे. कोणत्या पानावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे? हेच जर अभ्यास न केल्यामुळे त्याला सापडत नसेल तर अपयश निश्चितच असेल ना? अर्थात ह्या उपायाचा फारसा उपयोग झाला नाही कारण परीक्षा म्हणजेच आकलन, पात्रता, सुधारणा ह्या बेसिक व्यवस्थेवर आधारित असतात. जो अभ्यास करेल, आपली पात्रता सिद्ध करेल, त्याचाच विजय होत असतो पण अलीकडे परीक्षेपूर्वीच पेपर लिक होण्याची पद्धत अस्तित्वात आली आहे. आता ना ते पूर्वीचे विद्यार्थी घडविणारे शिक्षक अस्तित्वात आहेत ना प्रामाणिक, सचोटी जोपसणारे विद्यार्थी शिल्लक राहिले आहेत. आता खुद्द शिक्षकच किंवा परीक्षेशी संबंधित लोकच पेपर लिक करू लागलेत. त्यावेळी मात्र प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ लागला आहे. हा अन्याय त्या पात्र विद्यार्थ्यांनी का म्हणून स्वीकार करावा? रात्रंदिवस अभ्यास करून जे विद्यार्थी कष्ट करून आपले भविष्य घडविण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर हा अन्यायच नाही तर खुलेपणाने केलेला अत्याचारच आहे असे म्हणावे लागेल. मग परीक्षा घ्यायच्या तरी कशाला? नाही तरी आजकाल मागच्या दाराने प्रशासनिक व्यवस्थेसाठी पात्र नसलेल्या लोकांना त्या हुद्द्यावर बसविलेच जात आहे. त्यामुळेच देश खोल खड्ड्यात गेला आहे. मग काही ठिकाणी परीक्षा घेण्याचा हा फार्स करायचा तरी कशाला?
जो विद्यार्थी परीक्षेचा फॉर्म भरेल त्याला उत्तीर्ण करून टाका. पुढे तो आपल्या अक्कल हुशारीने त्याला वांच्छित असलेली जागा मिळवेल किंवा ज्याच्यात पात्रता नाही तो त्या जागेवर रुजू होईल कारण अभ्यास करायची देखील एक मानसिकता असते. एक टेम्पो असतो. परीक्षा जवळ आली की विद्यार्थी झटून अभ्यासाला लागतात पण अशा पेपरफुटीने त्यांचे लक्ष विचलित होते. त्यांच्या मनात क्षोभ उसळतो. केलेली मेहनत वाया गेल्याची भावना निर्माण होते. शिवाय आजकाल नीटची परीक्षा अनिवार्य झाली आहे. कित्येकांचे भविष्य त्यावर निर्धारित होत आहे. अशाप्रकारे ओरड झाल्यावर परीक्षा स्थगित करण्यात येतात. केलेली तयारी, श्रम वाया जातात. परत परीक्षेचे फॉर्म भरावे लागतात. त्यासाठी भरमसाठ शूल्क आकारले जाते. ते भरण्याची क्षमता सर्वांमध्ये असतेच असे नाही. त्यामुळे आता विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत पण त्याचे कोणालाच काही वाटत नाही.
दोषीना पकडले जाते, त्यांच्यावर कारवाई केली जाते. निकाल प्रलंबित राहतात पण आपल्या देशाच्या भावी पिढीचे किती नुकसान होते? ह्याचे कोणालाच काहीच पडलेले दिसत नाही. ते विद्यार्थी रडतात, मायूस होतात, नैराश्यात जातात. असे घडवणार आहोत का आम्ही देशाचे वारसदार? शेवटी परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणाची असते? सरकारचीच ना? मग का नाही नेमत तुम्ही जबाबदार मंडळी त्या संस्थेवर? का होतात पेपर लिक? तेव्हा कुठे जाते तुमची शासकीय यंत्रणा? पोलीस यंत्रणा? का तुम्हाला पण तेच हवे आहे? सारखे सारखे पेपर लिक होत राहतील, विद्यार्थी परत परत परीक्षेला बसत राहतील, त्यांनी परीक्षेसाठी भरलेली फी तुमच्या खात्यात जमा होत राहील, तुमच्या जमेत वृद्धी होतच राहील आणि तुम्ही मनमानी करून मागच्या दराने अपात्र पण तुमच्या मर्जीतल्या काही खास लोकांना प्रशासकीय असलेल्या महत्त्वाच्या हुद्द्यावर बसवत राहणार आहात? जो समाज किंवा देशाच्या हिताचे उद्दिष्ठ समोर न ठेवता तुमच्या हातातील कळसूत्री बाहुली बनून तुमच्या ईशाऱ्यावर नाचत राहील. असा हवा आहे का आपला भारत देश तुम्हाला? ज्यात तुमच्या चुकीच्या धोरणाला, चुकीच्या निर्णयाला विरोध करण्याची क्षमता नसेल? समजत नाही, हे सर्व करून नेमके काय मिळणार आहे? चला, पेपर लिक करून त्या महाभागाला मिळत असतील काही पैसे पण तुम्ही दक्ष राहायला नको का? त्याचे मनसुबे काही व्यवहार होण्याच्या अगोदर तुम्हाला समजू नये का? बाकी निवडणुका, न्यायालये आणि माध्यमे ह्यावर तर तुम्ही पूर्णपणे अंकुश ठेवलेला आहे. मग ह्यावरच तुमचा कंट्रोल कसा सुटतो? हे त्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि या देशाचे दुर्दैव नाही तर काय आहे?
काल परवाच झालेल्या नीटच्या पेपर फुटीने आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था किती ढिसाळ पद्धतीची झाली आहे, हे लक्षात आले. आधी परीक्षा चालू असताना कॉपी करणे ही पद्धत अवलंबली जात होती. तसेच काही उद्दाम मंडळी चक्क चाकू, सुऱ्या बेंचवर ठेवून उघडपणे कॉपी करायचे. पुढे अभ्यक्रमातील पुस्तके देऊनही काही उपयोग झाला नाही आणि आता तर चक्क परीक्षा देण्यापूर्वीच पेपर फुटी होते. ही बाब विश्वासार्ह असल्यामुळे ज्यांना ही प्रश्न पत्रिका मिळते, ते त्याचाच अभ्यास करून परीक्षा देतात. देशभरातील इंजिनिअरिंग, वैद्यकीय, फार्मसी आणि इतरही अनेक क्षेत्रात नीटची परीक्षा देणे अनिवार्य असते. अनेक अभ्यासक्रमांसाठी नीटचे गुण ग्राह्य धरले जातात. अखिल भारतीय कोट्यासाठी असणाऱ्या जागा नीटद्वारे भरल्या जातात. अशी परिस्थिती असताना हे पेपर फुटीचे संकट विद्यार्थ्यांवर कोसळल्यावर त्यांना परत परीक्षा द्याव्या लागतात. त्यासाठी विलंब होतो. अभ्यासक्रम उशिरा सुरु होतो आणि ह्या धुमश्चक्रित विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होते. हे सर्व अपेक्षित आहे काय? जूनमध्ये सुरु होणारी कॉलेजेस चक्क ऑगस्टमध्ये सुरु होतात. पर्यायाने जो पण अभ्यासक्रम असतो तो शिकवायला कमी अवधी मिळतो. त्यात विद्यार्थ्यांचेच नुकसान होते. ते जेरीस येतात. ते ना आरत्र राहत, ना परत्र राहतात.
खरं तर जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्याच प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता नसते, आपले आयुष्यच आपल्याला प्रत्येक पाऊलावर ते जीवन शिक्षण देत असते, असाही एक विचारप्रवाह दिसून येतो पण एखाद्या विषयातील सखोल ज्ञान प्राप्त करायचे असल्यास विकसित अशा तंत्रज्ञानाचा, नवीन आविष्कारांचा अभ्यास करणे गरजेचे बनते. नव्हे ती काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत हा सगळा सावळा गोंधळ आपल्या शिक्षण क्षेत्रात सुरु आहे. ही खरोखरच गंभीर गोष्ट आहे. शिवाय अशी कॉपी करून पास होणे ही काही गौरवाची गोष्ट नाहीच कारण अपुरे ज्ञान ग्रहण करून, कॉपी करून तुम्ही त्या विषयातील तज्ज्ञ होऊच शकत नाही. मग तुम्ही पुढे जाऊन काय दिवे लावणार आहात? तुमच्याकडे पदवी असेल पण त्यातील ज्ञानाचे काय? त्या पदवीमुळे तुम्हाला एखादी नोकरी मिळू शकते पण तुमची पात्रता काय? त्यात कशी सुधारणा करणार? हे गंभीर प्रश्न खरोखरीच महत्त्वाचे वाटतात.
एखाद्याला बुकिश ज्ञान असून सुद्धा प्रत्यक्षात व्यावहारिक जीवनात ते आचरणात आणता न आल्यामुळे तुमची यशाची घोडदौड तेथेच थांबते. मग अशा आमच्या देशाच्या भावी पिढीला केवळ पदवी हवी का प्रत्यक्ष त्याचे ज्ञान हवे आहे? ज्याचा तुम्ही उपयोग करून घेऊन आपले भविष्य साकारणार आहात! प्रश्नच प्रश्न आहेत. त्याला साजेसे उत्तर आज आमच्याकडे नाहीय. आता तर असे वाटू लागले आहे की नकोच घ्यायला अशा परीक्षा! सरळ वशिल्याने वशिल्याच्या तट्टूचा भरणा करावा, त्यांना नोकऱ्या प्रदान कराव्यात आणि खानापूर्ती करून, खोगीरभरती करून देश चालवावा. नाही तरी इतर सर्वच क्षेत्रात वशिलेबाजी, खोटेपणा चाललेलाच आहे. त्यात शिक्षण क्षेत्राची अजून भर पडली तर काय बिघडणार आहे? शिवाय आता शिक्षणाची गरज तरी कुठे उरलीय? देशाची जनता मनुस्मृतीकडे वळत चालली आहे. जुने ते सोने ह्या भावनेतून संपूर्ण देशाची जनता धर्म, कर्मकांड करू लागले आहेत. बाबा, बुवांचे प्रस्थ वाढत चालले आहे. ते जे पूजा-पाठ, अनुष्ठान सांगतात, त्याकडे लोक आकर्षित होऊ लागले आहेत. मग शिक्षणाची गरज उरतेच कुठे? आज आमचे सुशिक्षित लोक देखील भविष्य, अनुष्ठान, पूजा, मंतर तंतर ह्यावर विश्वास ठेवू लागले आहेत. एखाद्या अशिक्षित भोंदू बाबाच्या नादी लागून आपले भविष्य घडविण्याच्या मागे लागले आहेत. गोबर, गोमूत्र, स्वमूत्र किंवा एखाद्या बाबाचे मूत्र पिऊन आम्हाला असा फायदा झाला, असे म्हणू लागले आहेत, तेव्हा आमच्या शिक्षणाचा काय उपयोग? जाऊ यात त्या भोंदू बाबांच्या आहारी! जाणून घेऊ यात त्याच्याकडून आपले भविष्य! गोबर, गोमूत्र पिऊन बरे करू यात आपले असाध्य रोग! डॉवटर जे मल्टिव्हिटॅमिन, कॅल्शियम, आयरन, झिंक खायला सांगतात त्याची तरी काय गरज आहे? ते सर्व आम्हाला गायीचे मूत्र आणि गोबर मध्येच मिळणार तर आहे... त्यापेक्षा खेड्यात जाऊ. गायी पाळू अन् खात बसू त्यांचे गोबर आणि पीत बसू त्यांचे मूत्र! सर्वात सोप्पा उपाय! आहे काय अन् नाही काय? जीवनाला आवश्यक असलेले पौष्टिक पदार्थ जर आपल्याला बसलेल्या जागेवरच उपलब्ध असतील तर कशाला गरज पडेल आम्हाला चंद्रावर जाण्याची! आम्ही आहोत तेथेच ठीक आहोत. खुशाल आहोत. नाही का? उगाच कशाला महत्त्वाकांक्षा बाळगायच्या?
कशाला विश्वगुरू होण्याची स्वप्ने पाहायची? सगळेच काही विश्वगुरू बनत नाहीत. बाकीचे सर्व त्याचे शिष्य असतात. ते शिष्य बनण्यातच सार्थकता मानावी, अनुभवावी! नको ते शिक्षण, नको ती शाळा, महाविद्यालये! नकोत त्या परीक्षा! शेवटी शिकून कोणाचे भले आहे तर आपले भले होईल आणि न शिकताही देशाचे सर्वोच्च पद मिळू शकते ह्याचे ढळढळीत उदाहरण समोर असताना चिंता कशाला करायची? जुमलेबाजी केली की आहेच जनता आपल्या बाजूने कौल द्यायला मोकळी आणि वशिलेबाजी करून मिळतील की नोकऱ्या मागच्या दरवाज्याने! जुमलेबाजी आणि वशिलेबाजी हीच तर पात्रता जोखली जाते मग कशाला शिकता? कशाला वयाच्या 25-30 वर्षांपर्यंतचे आयुष्य वाया घालवता? त्यामुळे अधिकची स्वप्ने पाहू नका. आहे ना आपल्याकडे एक विश्वगुरू? तो सर्वांचेच भले करेल.
वाचक हो, अतिशय उद्विग्न मनःस्थितीत हा लेख मी लिहित आहे. त्या परीक्षा देणाऱ्याच विद्यार्थ्यांनाच नाही तर आता मला देखील नैराश्य येऊ लागले आहे पण सर्व गोष्टी आपल्या हातात थोडीच असतात? समाजात हे असे सर्व पातळ्यांवर घडतंच आहे. त्याला पायबंद घालायचा असेल तर प्रत्येकाने जागरूक व्हायला पाहिजे. ह्या अन्यायाचा ठामपणे विरोध करायला पाहिजे. इकडे आपण आरक्षणाच्या बाबतीत ओरड करतो. आरक्षण कोट्यातून पास झालेले विद्यार्थी खरंच का पात्र आहेत? यावर शंका घेतो पण मग अशा परीक्षा देऊन पास होणाऱ्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांबाबत आपल्याला शंका का येत नाही? ते आम्हाला चालते. त्यांच्या ज्ञानावर आम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवायचा का? अशा पद्धतीने पास झालेला डॉक्टर किंवा इंजिनिअर खरंच का त्या पात्रतेचा असू शकतो? मग का उखडतात आमचे रस्ते? का पडतात आमचे पूल? का दगावतो आमचा रुग्ण? अर्थात माझा आक्षेप सर्व विद्यार्थ्यांवर किंवा सचोटीने पास होणाऱ्या त्या ज्ञानी व्यक्तिवर नाहीच आहे. माझा आक्षेप त्या भोंदू व्यक्तिवर आहे ज्याने अशा प्रकारचा प्रमाद केला आहे.
जरी असे पेपर लिक करणारे कितीही दलाल आपल्या समाजात असले तरी आपण का बळी पडतो त्यांच्या प्रमादाला? त्यांना तर पेपर लिक करून आर्थिक प्राप्ती होत असते पण आपले काय? आपले तर अवघे आयुष्यच पणाला लागते आणि शेवटी जरी यश मिळाले तरी ते आपले असतेच नाही. असे यश मिळविण्यात काय अर्थ आहे? ह्याचा विचार तरी सुज्ञांनी करायला हवा.
आपल्या देशातील बरेच विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्यास प्राधान्य देतात. त्यांना ते परवडते. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग ते आपली आत्मोन्नती करून घेण्यात करतात पण सर्वसामान्य जनतेचे काय? त्यांनी असेच जगायचे का? त्यांनी तरी आत्मावलोकन करावे आणि लिक झालेल्या पेपरांना भीक न घालता आपण जे आत्मसात केले, त्याप्रमाणे पेपर लिहावा. तुम्ही जर ते लिक झालेले पेपर पाहिलेच नाहीत तर कशाला स्थगित होतील परीक्षा? कशाला शंका घेतली जाईल तुमच्या पात्रतेवर? विद्यार्थ्यांनो, माझ्या देशाच्या आधारस्तंभानो! तुम्ही नका बळी पडू ह्या व्यवस्थेला! नका तुकवू अशा लोकांच्या पुढती माना! जेव्हा तुम्हीच प्रतिसाद देणे बंद कराल तर कशाला करतील ते पेपर लिक? एखाद्या गोष्टीला प्रचंड प्रतिसाद दिला तरच त्यांची हिंमत वाढते. त्याला वेळीच खीळ घाला. अशाप्रकारच्या तुम्हाला बरबाद करणाऱ्या विषवल्लरी ठिकठिकाणी उगवलेल्या आहेत. त्यांना समुळ नष्ट करण्याचा विडा तुम्ही उचललात तर सर्व काही ठीक होईल. ना तुम्ही अमिषाला बळी पडाल अन् ना ही त्यांचे वाईट मनसुबे पूर्णत्वाला जातील. शेवटी आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बनण्यातच पुरुषार्थ आहे, सार्थकता आहे, हे लक्षात ठेवा.
-चंद्रलेखा बेलसरे
9850895051
साहित्य चपराक मासिक जुलै २०२६
.jpg)



Comments