top of page

पत्रकारिता म्हणजे घाईघाईतले साहित्य

  • 2 hours ago
  • 4 min read

पत्रकारितेनंतर चित्रपट निर्मितीचा अभ्यास करताना कथात्मक चित्रपटांबरोबरच अनुबोधपटांचेही अध्ययन झालं. त्यावेळी एक गोष्ट आवर्जुन लक्षात आली ती म्हणजे वस्तुस्थितीवर आधारित असणारा अनुबोधपट वास्तवाचं एक प्रतिभावान प्रतिनिधित्व असतो. अरेच्च्या! हे तर पत्रकारिता करताना आपण करत होतो आणि इतर अनेकांनीही केलेलं पाहत होतो. पत्रकारांना बातम्या लिहिण्यासाठी, वेळेची पूर्तता करण्यासाठी घाई करावी लागते. बातम्यांसाठी लेखन प्रक्रिया अत्यंत जलद गतीने होत असल्याने चालू घडामोडींचे त्वरीत वृत्तांकन करण्याची आवश्यकता असते. मात्र तरीही साहित्यिक लेखनाची कला आणि कौशल्य अवगत करून आपल्या वाचकांपर्यंत  माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. चर्चेचा भाग म्हणून, साहित्य आणि पत्रकारिता यांच्यातील फरक करताना सांगितले जाते की साहित्य अक्षर असते. साहित्यिक निर्मितीमध्ये काही तरी कायम स्वरूपाचे असते परंतु वृत्तपत्रीय लेखन दुसऱ्या दिवशी शिळे होते. लेखकाला किंवा कवीला आपली कला पूर्ण करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नसते. तो एक कलाकार असतो आणि तो घाईघाईत काम करू शकत नाही. त्याच्या भावना शांततेत आठवल्या जातात. त्याच्या अगदी उलट पत्रकार आहे. त्याच्यासाठी घड्याळाच्या काट्याबरोबर धावणे महत्त्वाचे असते. शिवाय पत्रकारिता आणि साहित्यातील फरक मुख्यतः लक्ष्यित वाचकांच्या स्वरूपामुळे आहे. आपण ज्याप्रमाणे बातम्या वाचतो त्याचप्रमाणे कविता किंवा कथा, कादंबरी वाचत नाही.  


वाचकांना गुंतवून ठेवण्यासाठी कथानक, रचना आणि वर्णनात्मक भाषा यासारख्या साहित्यिक तंत्रांचा पत्रकार वापर करतात आणि यातून साहित्याचा एक प्रकार उद्भवतो, साहित्यिक पत्रकारिता. चित्रा सुब्रमण्यम (बोफोर्स घोटाळ्यावर) आणि एस. हुसेन झैदी (1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांवर) यांचे लेखन अनेकदा वृत्तपत्र मालिकेत प्रकाशित केले गेले. या लेखांमध्ये जटिल वास्तव उघड करण्यासाठी तपशीलवार कथाकथन, पात्र विकास आणि कथानक रचना वापरली जाते, जी सामान्यतः साहित्याशी संबंधित असते, जी प्रत्यक्षात साहित्यिक पत्रकारिता दर्शवते. या व्यतिरिक्त, पत्रकारितेतील साहित्याचे प्रमुख उदाहरण म्हणून सांगता येतील असे काही प्रमुख भारतीय पत्रकारांचे आत्मचरित्र आणि त्यांच्या लेखांचे संग्रह प्रकाशित झाले आहेत. उदाहरणार्थ, विनोद मेहता यांचे लखनऊ बॉय किंवा खुशवंत सिंग यांचे ट्रुथ, लव्ह अँड अ लिटिल मॅलिस सारख्या पुस्तकांमध्ये सुरुवातीला वर्तमानपत्रे आणि मासिकांसाठी ‌‘घाईघाईत‌’ तयार केले गेलेले असे लेखन संकलित केले होते परंतु त्यांचे साहित्यिक मूल्य कायम राहिले. त्वरेने बातमी लिहिण्याचा दबाव कधीकधी चुका करू शकतो परंतु चांगली पत्रकारिता वेळेच्या मर्यादा असूनही साहित्यिक मानके राखण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये शिकलेलं ब्रिटिश कवी आणि समीक्षक मॅथ्यू अर्नोल्ड (1822-1888) यांचं सुभाषित  ‌‘जर्नालिझम इज लिटरेचर इन ए हरी‌’ अर्थात पत्रकारिता म्हणजे घाईघाईतले साहित्य महत्त्वाचं ठरतं.


मानसिक संतुलन बिघडल्यामुळं बेफाम गाडी चालवून अनेकांच्या मृत्युला जबाबदार असलेल्या वाहनचालक संतोष माने याला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावताच ‌‘मानेला फास‌’, अवकाशसंशोधकांनी बुध ग्रहाचे ग्रहपद काढून घेतल्यानंतर ‌‘बुधाचे ग्रह फिरले‌’, एका पावसाळ्यात पंढरपुरात प्रचंड प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळं पेठांतून जाण्यासाठी होड्यांचा वापर करावा लागल्यावर ‌‘पंढरपूरचे व्हेनिस‌’, संजय लीला भन्साळी यांचा बाजीराव मस्तानी (2015) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही कालावधीतच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या विवाहाची बातमी देण्यासाठी ‌‘मस्तानी अखेर बाजीरावचीच‌’ या मला अतिशय आवडलेल्या काही हेडलाईन्स, मॅथ्यू अर्नोल्ड यांच्या सुभाषिताची साक्ष आहेत. क्रिकेट सामन्याच्या वेळी सुद्धा, जिंकणाऱ्या खेळाडूंबद्दल विजयाचे शिल्पकार तसेच रटाळ खेळ करणाऱ्या संघाबद्दल कंटाळवाण्या खेळांचे राजे असाही उल्लेख करून बातमीचे साहित्यिक मूल्य वाढवलेलं मी वाचलं आहे. त्याचप्रमाणं प्रचंड मर्यादा असूनही 2018 या वर्षी विम्ब्लडन तसेच फिफा सामन्यांचं अतिशय प्रतिभाशाली वृत्तांकन केल्याबद्दल द हिंदु दैनिकाचं कौतुक करण्यात आलं होतं.


महाविद्यालयीन शिक्षणाच्या पहिल्या वर्षानंतर मी अर्थशास्त्र विषयाला हात लावलेला नव्हता. तरीही मी ‌‘इकॉनॉमिक टाइम्स‌’ विकत घेत होतो कारण एकच, त्यांच्या बातम्यांचे मथळे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एका विमान कंपनीची विशिष्ट योजना अपेक्षित वेळेत सुरू होताना दिसेना तेव्हा ‌‘इकॉनॉमिक टाइम्स‌’ने ‌‘एअर इंडियाची ती योजना अजून जमिनीवरच‌’ असा उड्डाण न करता धावपट्टीवरच राहिलेल्या विमानाशी साधर्म्य दाखवणारा मथळा दिला होता. अशा प्रकारचे मथळे ‌‘इकॉनॉमिक टाइम्स‌’मध्ये जवळपास रोजच येत असत आणि ते मला खूप सृजनात्मक तसेच मनोरंजक वाटत असत. अशा प्रकारे मथळे द्यायची पद्धत नंतर अनेक वृत्तपत्रांनी अंगिकारली.


इकॉनॉमिक टाइम्सच्या पान क्रमांक दोनवर राजकीय बातम्या छापल्या जात. त्यासाठी पानाच्या वरच्या बाजूला मोठ्या अक्षरांत एक भन्नाट मथळा असे : फॉर द कॅनॉयझर्स ऑफ इंडियन पॉलिटिकल थिएटर अर्थात भारतीय राजकारणमंचाच्या रसिकांसाठी. राजकारणातले छक्के-पंजे, कुरघोड्या, घराणेशाही याबद्दलच्या बातम्या या स्तंभामध्ये खूप रंजक मजकुरात प्रसिद्ध केला जात असत.


‌‘इकॉनॉमिक टाइम्स‌’मध्ये येणारी व्यंग्यचित्रे ही खास आर्थिक क्षेत्राशी जवळीक साधणारी असत. मला आठवतं की एका ‌‘व्हॅलेंटाईन डे‌’च्या दिवशी छापलेले व्यंग्यचित्र अफलातून होतं. त्यामध्ये एक मोठ्या पदावरील व्यावसायिक आपल्या सहकाऱ्याला सांगत आहे - दहा वर्षांपूर्वी मी फक्त पन्नास रुपये गुंतवून बॉसच्या मुलीला गुलाबाचं फूल दिलं आणि आज मी पन्नास कोटीची उलाढाल असलेल्या व्यवसायात मुख्य भागीदार आहे. आर्थिक क्षेत्रात अशा पल्ल्याची कल्पक मांडणी फक्त इकॉनॉमिक टाइम्समध्येच होऊ शकली.


दैनिकात छापल्या जाणाऱ्या व्यंग्यचित्रांतून तर असंख्य वेळा सृजनता विखरली जाते. 26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर त्यामध्ये आपला काहीही हात नाही असं सांगून पाकिस्तानने उलट पुरावा मागितला होता. कसाबला पकडल्यावर ती बातमी तेथील वृत्तपत्रांतूनही प्रकाशित झाली होती. ती पाहून कसाबच्या बापानं ‌‘हा माझा मुलगा असल्या‌’चं सांगितल्यावर त्यालाही पाकिस्तानने ‌‘काय पुरावा आहे?‌’ असं प्रस्तुत करून व्यंग्यचित्रकार मंजुळ यांनी धमाल केली होती.


माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत मॅथ्यू अर्नोल्ड यांचं सुभाषित जणु कोळुन प्यालो होतो. त्यामुळे शक्य आणि बहुतेक ठिकाणी अलंकृत भाषेचा उपयोग अगदी आपसुक झाला. आता वर्ष आठवत नाही पण 1990चं दशक असावं. तेव्हा पुण्यात कचरा उचलण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची यंत्रे आणली होती. त्याचं नेमकं स्वरुप दाखवण्याकरिता या यंत्रांची मंडई ते मनपा अशी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी पुण्यातील पुढारी मंडळी पुढं आणि त्यांच्यामागं कचरा उचलण्याची यंत्रे असं ते मिरवणुकीचं स्वरूप होतं. मी तंतोतंत तसाच उल्लेख बातमीत केला. वरवर पाहता मिरवणुकीची ही एक दृश्य रचना होती पण आत खोलवर त्यात एक गर्भितार्थ लपला होता आणि तो म्हणजे ही नवीन यंत्रे आपल्यापुढं चालत राहिलेला कचरा उचलण्यासाठी सज्ज होती. ही बातमी मी मिड डे साठी लिहिली होती. त्यावेळी माझे मित्र मायकल गोंसाल्विस संपादकपदी होते. ते म्हणाले, “यावर विरोधी प्रतिक्रिया येतील.”


“आल्याच तर मी त्या झेलीन!” मी उत्तरलो. प्रस्तुत बातमी मिडडेने जशीच्या तशी छापली पण प्रतिक्रिया द्यायला या त्या पुढाऱ्यांना तितकं इंग्रजी समजलं असतं तर ना?


विजय कोंडके निर्मित-दिग्दर्शित ‌‘माहेरची साडी‌’ जुलै 1993 प्रदर्शित झाला आणि त्या रात्रीच्या पार्टीमध्ये आम्ही पत्रकारांनी दादा कोंडके यांना एक गंमतशीर प्रश्न विचारला की “पुतण्याने माहेरची साडी केली आता तुम्ही काय करणार आहात?”


दादा खूपच हजरजबाबी. त्यांनी तात्काळ उत्तर दिलं, “सासरचं धोतर!” आणि काही महिन्यांतच दादांनी आपला पुढचा चित्रपट खरंच याच शीर्षकाचा जाहीर केला.  सासरचं धोतरचं छायाचित्रण कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओच्या आवारात करण्यात आले. त्यासाठी पत्रकारांना निमंत्रित करण्यात आलं होतं. जयप्रभा स्टुडिओत कलावंत आणि तंत्रज्ञ यांच्या लगबगीनं रसरशीत वातावरण निर्माण झालं होतं. याचं वर्णन मी या शब्दांत केलं : “दादांच्या रुपातील 61 वर्षांचा नायक पाहून 66 वर्षांचा जयप्रभा स्टुडिओ शहारून गेला होता!”


मराठी अभिनेते सूर्यकांत यांच्या ‌‘धाकटी पाती‌’ आत्मचरित्राला महाराष्ट्र सरकारचा एक पुरस्कार मिळाला होता. अभिनय क्षेत्रात काम करीत होते तरी सूर्यकांत यांनी आपल्या पुस्तकात वापरलेली अलंकारिक भाषा, प्रतिमा, उपमा तसेच वाक्प्रचार, म्हणी यामुळे ‌‘धाकटी पाती‌’तील अर्थालंकार अत्युच्च दर्जाचं झाले होते. सूर्यकांत यांना भेटून मग या आत्मचरित्रावरील लेखाला मी शीर्षक दिलं : साहित्यिक सूर्यकांत. प्रस्तुत लेखासहित शीर्षकालाही चांगली पसंती मिळाली.


डॉ. चंद्रशेखर जोशी

+919890389715

साहित्य चपराक मासिक जुलै २०२६

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page