मराठी मालिकांचा घसरता दर्जा
- 1 day ago
- 9 min read
रात्रीचे आठ वाजतात. महाराष्ट्रातील घराघरांमध्ये एक यांत्रिक सोहळा सुरू होतो. रिमोटचे बटण दाबले जाते, टीव्हीची स्क्रीन उजळते आणि डोळे दिपवणारा भडक सेट आणि कानाचे पडदे फाडणारा पार्श्वसंगीताचा आवाज थेट दिवाणखान्यात आदळतो. पडद्यावर कुणाच्या तरी हातातून चहाचा ट्रे खाली पडतो. कॅमेरा अत्यंत हिंसकपणे त्या पात्राच्या चेहऱ्यावर झूम-इन आणि झूम-आऊट करतो; त्यानंतर घरातील इतर पाच जणांच्या चेहऱ्यांवर तो फिरतो. प्रत्येक झूमसोबत वाऱ्याच्या झोताचा आदळल्यासारखा आवाज येतो. सलग दोन मिनिटे कुणीही एक शब्द बोलत नाही; ते फक्त एकमेकांकडे डोळे विस्फारून बघत राहतात.

एकेकाळी घराघरांना आणि मनामनांना जोडणाऱ्या दूरचित्रवाणीवरील मालिकांचा दर्जा घसरत आज चालला आहे हे एक बहुमान्य आणि उघड सत्य आहे. साहित्याला आणि दृश्य-कलेला जोडणारा हा दुवा आज एका चिंताजनक आणि कर्कश मेलोड्रामाच्या कारखान्यात रूपांतरित झाला आहे. मराठी टेलिव्हिजनचा तो सुवर्णकाळ आजच्या प्रेक्षकांसाठी केवळ एक सुंदर नॉस्टॅल्जिया म्हणून उरला आहे. आजच्या काळातील मालिका मग त्या पौराणिक असोत, ऐतिहासिक असोत, विनोदी असोत किंवा कौटुंबिक या नवीन मालिकांसोबत तो जुना जिव्हाळा आणि आत्मीयता अजिबात जाणवत नाही. असे का बरे? एवढी नापसंती आणि नीरसता असूनही या मालिकांचा एवढा सुळसुळाट कसा? आणि तरीही यांचा टीआरपी एवढा कसा? याच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणांचा धांडोळा आपण घेणार आहोत.

माध्यमांनी केवळ मनोरंजन करावे की समाजाला काही तरी दिशा द्यावी, हा वाद तसा जुनाच आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र पवार यांनी एका जाहीर सभेत एक विधान केले. ते म्हणाले की, “दूरचित्रवाणीवर सतत रामायण किंवा महाभारतासारख्या मालिका दाखवण्याऐवजी, नागरिकांना भारतीय संविधान आणि त्याची मूल्ये दाखवून जागरूक केले पाहिजे.” ही अपेक्षा अजिबात चुकीची नाही कारण टीव्ही हे तळागाळापर्यंत पोहोचणारे सर्वात प्रभावी माध्यम आहे! पण इथे एक विरोधाभास प्रकर्षाने मनाला बोचतो. त्यांच्याच कार्यकाळात दूरदर्शनच्या राज्यसभा चॅनेलने संविधानाच्या निर्मितीप्रक्रियेवर आधारित, श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘संविधान - द मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’ हा एक अप्रतिम आणि दर्जेदार कार्यक्रम प्रसारित केला होता पण तो किती प्रेक्षकांपर्यंत पोहोचला? त्याची किती जाहिरात करण्यात आली? तो त्या किंवा इतर वाहिन्यांवर पुनर्प्रसारित व्हावा यासाठी सरकारतर्फे पुन्हा काही पाऊले उचलली गेली का? त्याला किती लोकांनी डोक्यावर घेतले? याचा अर्थ प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या आवडीचा आणि प्रबोधनाच्या निवडीचा दर्जा देखील खालावला आहे असा घ्यावा का?
महाराष्ट्राला प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा आणि समृद्ध साहित्याचा मोठा वारसा आहे पण आजच्या मालिकांमध्ये हा वारसा कुठे दिसतो? महाराष्ट्रातील श्रमिक, शेतकरी, ग्रामीण, निमशहरी आणि विविध सांस्कृतिक समूहांचे खरे जगणे मालिकांमधून कधीच हद्दपार झाले आहे किंवा काही मालिकांमध्ये ते ग्रामीण जीवनही विसंगत किंवा अतिशय भडक दाखवण्यात येते. त्यातील बऱ्याच गोष्टी एकतर कालबाह्य झालेल्या आहेत किंवा कथानक लिहिताना स्थळ , काळ, लोकजीवन, बोलीभाषा यांचा अभ्यास न करता रिकाम्या जागा भरल्या जात आहेत. जर अन्नात भेसळ झाली तर त्यांच्यावर अन्न आणि औषध मंत्रालय कार्यवाही करू शकते पण जाहिरातींचा मारा असलेल्या दर्जाहीन कन्टेन्टवर सेन्सॉर बोर्ड काय कार्यवाही करत आहे? कुणी काय बघावे हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य असले तरी पैसे देऊन दर्जाहीन कन्टेन्ट आणि अमर्याद जाहिराती विकत घेणे हा प्रेक्षकांच्या अधिकारांचा भंग नाही का?
केवळ कौटुंबिक मालिकाच नाही तर ऐतिहासिक आणि चरित्रात्मक मालिकांची अवस्थाही चिंताजनक आहे. अलीकडेच महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिका बंद पडणार असल्याची बातमी आली. त्यावर याच मालिकेत जोतीबांची भूमिका करत असलेले निर्माते आणि अभिनेते अमोल कोल्हे यांची एक प्रतिक्रिया आली. त्यांनी नाराजी व्यक्त केली की, 2017 साली अनवधानाने नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याबद्दल त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती मात्र सावित्रीबाई फुले मालिकेत जोतीबा फुले यांची भूमिका साकारताना त्यांना कोणत्याही प्रकारचे कौतुक किंवा समर्थन मिळाले नाही. शिवाय ही मालिका बंद झाली म्हणून अनेक जण सोशल मीडियावर रील्समधून गळे काढत आहेत पण इथे एक प्रश्न विचारणे गरजेचे आहे ती मालिका जर बंद झाली नसती तरी एखाद्या महापुरुषावर आधारित या मालिकेचा दर्जा खरोखर उच्च होता असे म्हणता येईल का? स्वतः त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करणारे, इतिहासाची जाण असणारे वाचक या मालिकेला तथ्यांच्या पारड्यात किती गुण देतील? कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर कलाकृती साकारताना भक्कम संशोधन आणि तथ्यांची जोड असणे ही प्राथमिक अट असते पण या मालिकेत क्रिएटिव्ह स्वातंत्र्याच्या कुबड्या घेऊन अनेक तथ्यहीन आणि तर्कहीन प्रसंग दाखवले गेले. या समाजसुधारक दाम्पत्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या लोकांनी अशा सादरीकरणावर नक्कीच आक्षेप घ्यायला हवा. इतिहासाची मोडतोड करून आणि नाट्यमय रंगात बुडवून महापुरुषांचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसतात, हेच यातून सिद्ध होते.
या सगळ्या गदारोळात एका मोठ्या प्रेक्षकवर्गाने डिश टीव्ही आणि केबल कनेक्शनला वाळीत टाकून, आपल्या मनोरंजनाच्या गरजा ओटीटीसारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. आजकाल ‘आम्ही टीव्ही सिरिअल्स बघत नाही,’ हे सांगणे ‘आम्ही चहा घेत नाही’ असे सांगण्यासारखे प्रतिष्ठेचे झाले आहे. इतकेच काय, जे अद्याप टीव्ही बघत आहेत त्यांनी फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर ‘मराठी सिरियल्सला वैतागलेली मंडळी’ असा एक ग्रुपच काढला आहे. या ग्रुपचे तब्बल 36 हजारपेक्षा जास्त सभासद आहेत! या मंचावर सुरू असलेल्या मालिकांमधील कन्टेन्टवर, निर्मितीतील चुकांवर आणि पात्रांच्या उथळ अभिनयावर ज्याच्या त्याच्या वैताग लेव्हलनुसार मुद्देसूद समाचार घेतला जातो. कथानकातील विसंगतींवर बनणारे भन्नाट मीम्स हे प्रेक्षकांच्या साचलेल्या संतापाचेच रूप आहे. प्रेक्षक आता बंड करत आहेत पण वाहिन्यांच्या बंद खोल्यांमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना हा आवाज कितपत ऐकू येतो की ते ऐकू येऊनही दुर्लक्ष करतात? की त्यांना या आवाजाची शब्दशः भाषाच कळत नाही.

कथेची शिस्त
दूरचित्रवाणीवरील कोणत्याही कलाकृतीचा मूळ गाभा म्हणजे तिचे लिखाण. लिखाणापासूनच मालिका निर्मितीला सुरुवात होते आणि नेमका इथेच आजच्या मालिकांचा पाया ढासळलेला आहे. पूर्वीच्या काळी मराठी मालिकांचे एक ठरावीक, शिस्तबद्ध आणि व्यावसायिक गणित असायचे. आजच्यासारख्या वर्षानुवर्षे रबरासारख्या ताणल्या जाणाऱ्या मालिका तेव्हा नव्हत्या. पूर्वी आठवड्यातून एकदा, ठरावीक दिवशी प्रसारित होणाऱ्या मालिकांना 13, 26 किंवा जास्तीत जास्त 52 भागांचे मर्यादित कंत्राट असायचे. कथेला किंवा मालिकेच्या संकल्पनेला एक निश्चित सुरुवात, मध्य आणि तितकाच प्रभावी शेवट असायचा. भाग मर्यादित असल्यामुळे कथेचा वेग कमालीचा असायचा आणि प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याची ताकद असायची. लेखकाला प्रत्येक भागावर प्रचंड मेहनत घ्यावी लागायची कारण तिथे कथा भरकटायला वावच नव्हता. खऱ्या आयुष्याशी साधर्म्य असलेले तर्कशुद्ध प्रसंग आणि त्यातून अलगद पेरली जाणारी जीवनमूल्ये यांची सुरेख मांडणी लेखक करत असत. आपल्याला दूरदर्शनवरील बंदिनी, गोट्या, युगंधरा, विधाता, श्रीयुत गंगाधर टिपरे सारख्या कौटुंबिक मालिका किंवा हसा चकट फू आणि कोपरखळी सारखे मार्मिक विनोद असलेले कार्यक्रम आजही आठवतात. लोक आजही युट्यूबवर या मालिका शोधून शोधून आपल्या मनोरंजनाची तहान भागवतात. त्या वेळच्या मालिकांच्या लिखाणात नातेसंबंध, भावभावना आणि माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तीचा एक सुंदर समतोल असायचा. विनोदी कार्यक्रमांमधील सामाजिक परिस्थितीवरील व्यंग्य हे निर्मळ, मार्मिक आणि तर्कशुद्ध असायचे. आजच्या मालिकांमधून ही निर्मळता आणि साहित्यिक वजन पूर्णपणे हरवले आहे. त्या दिवसेंदिवस केवळ भडक आणि उथळ होत चालल्या आहेत.
गेली अनेक वर्षे ऐतिहासिक मालिकांचे लिखाण करणारे लेखक युवराज पाटील म्हणतात “स्वराज्य सौदामिनी ताराराणी, उदे गं अंबे अशा ऐतिहासिक, पौराणिक मालिकांसाठी मी लेखन केले. या दरम्यान मला जाणवलं की प्रेक्षकांची अभिरुची म्हणून ऐतिहासिक तथ्यांशी तडजोड करावी लागेल का? असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा त्या तथ्यांचा मूळ गाभा हरवू नये यासाठी लेखकाने आग्रही असावं. चॅनल आणि निर्मिती संस्था यांच्या मध्ये त्यासाठी सुसंवाद हवा. आवडी निवडीसाठी आपण इतिहास नाही बदलू शकत. ज्यांचा इतिहासाशी कसलाही संबंध नाही किंवा इतिहासाबद्दल आस्था नाही अशा लोकांच्या हाती सूत्र असतील तर बऱ्याच अडचणीना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे कुठलीही ऐतिहासिक गाथा मालिकेच्या माध्यमातून मांडताना व्यावसायिक गणितांच्या पलीकडे त्या इतिहासावर प्रेम असणारी माणसं त्या कलाकृतीशी जोडली जावीत एवढी अपेक्षा आहे.”

सर्जनशीलता आणि मालिका
मालिकांच्या सुवर्णकाळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वेशभूषेत असलेला साधेपणा. रंगभूषा प्रसंग आणि पात्राला साजेशी असायची. त्यामुळे प्रेक्षक पात्राशी सहज एकरूप होऊन मालिका बघायचा. त्यावेळी आठवड्यातून एकदा प्रसारित होणाऱ्या मालिकांना जाहिरातीतून फारशी मोठी कमाई मिळत नव्हती. त्यामुळे यातील कलाकार आणि तंत्रज्ञांनी मालिका हे केवळ कमाईचे साधन असे गृहीत धरले नव्हते. ती त्यांची आवड होती, कला होती आणि या आवडीतूनच ते आपले 100% द्यायचे.
बजेट कमी आणि कल्पकता (कलात्मकता) जास्त हे त्या काळाचे मुख्य सूत्र होते. भव्य-दिव्य सेट, अवाढव्य खर्च किंवा परदेशातील चित्रीकरण यासाठी चॅनेल्सकडे पैसे नसायचे पण याच आर्थिक मर्यादेने तंत्रज्ञांना आणि दिग्दर्शकांना अधिक विचार करायला भाग पाडले. पैसा कमी पडला तरी चालेल पण कन्टेन्ट आणि सादरीकरणात कुठेही तडजोड न करण्याची एक सुजाण प्रगल्भता तेव्हाच्या निर्मिती संस्थांमध्ये होती. तिथे निर्णय घेणारे क्रिएटिव्ह हेड असे असायचे ज्यांना साहित्य आणि कलेची जाण होती. त्यात आजच्या मालिकांसारखी मार्केटिंग हेडची लुडबुड नसायची. हे क्रिएटिव्ह लोक दिग्दर्शकाचे निर्णय समजून घेऊन त्याला स्वातंत्र्य देणारे असायचे. आज कथा कशी असावी, हे मार्केटिंग टीम आणि जाहिरातदार ठरवतात, दिग्दर्शक नाही हे दुर्दैव.
नारबाची वाडी, जत्रा, झेंडा यांसारख्या 25 हून अधिक हिट चित्रपटांचे आणि श्रीयुत गंगाधर टिपरे, जस्सी जैसी कोई नही सारख्या गाजलेल्या मालिकांचे ज्येष्ठ छायादिग्दर्शक (डीओपी) राहुल जनार्दन जाधव यांनी दैनिक मालिकांचे चित्रीकरण सोडण्यामागचे कारण सांगताना सद्यस्थितीवर थेट बोट ठेवले आहे :
“मराठी मालिकांचा एकूणच दर्जा कमालीचा घसरला आहे. पूर्वी गंगाधर टिपरेमध्ये आबांच्या एका छोट्याशा एन्ट्री शॉटसाठीही आम्ही कॅमेऱ्याच्या पातळीवर प्रचंड मेहनत घ्यायचो; तेव्हा लेखनात ताकद होती आणि प्रयोगांना मोकळीक होती. आज मात्र विनोदाच्या नावाखाली होणाऱ्या कमरेखालच्या करमणुकीमुळे या मालिका कुटुंबासोबत, विशेषतः स्वतःच्या मुलीसोबत बसून पाहण्यासारख्या राहिलेल्या नाहीत. अशा आशयाचा भाग होणे मला कधीच आवडणार नाही.
सध्याच्या कौटुंबिक मालिकांमध्ये प्रत्येक सीनचे शॉट्स आधीच साचेबद्ध ठरवून दिलेले असतात, जिथे छायादिग्दर्शकाच्या सर्जनशीलतेला शून्य वाव असतो. अत्यंत यांत्रिक पद्धतीने होणाऱ्या या टीव्ही चित्रीकरणाच्या अनुभवाला चित्रपटसृष्टीतही काहीच मूल्य उरलेले नाही. म्हणूनच या दर्जाहीन तडजोडींचा भाग होण्यापेक्षा मी मालिकांचे चित्रीकरण पूर्णपणे थांबवून आता फक्त प्रोमोज चित्रित करणे पसंत करतो.”
मालिका विरुद्ध चित्रपट - कलाकारांचे आत्मपरीक्षण गरजेचे
निर्मिती संस्थेच्या या ढासळत्या रचनेसोबतच, आजच्या मालिकांमधील कलाकारांची मानसिकताही बदलली आहे. मध्यंतरी अलीकडच्या काळातील डेली सोपमध्ये काम करणारे काही कलाकार अशी तक्रार करत होते की, “मराठी चित्रपटसृष्टी आम्हाला महत्त्व देत नाही, आम्हाला चित्रपटात घेत नाही.”
त्यांचे हे रडगाणे ऐकल्यावर हसू येते. यामागे चित्रपट निर्मात्यांची दृष्टी दोषी नाही तर या कलाकारांच्या मालिकांचा आणि त्यांच्या अभिनयाचा खालावलेला दर्जा हे प्रमुख कारण आहे, हे त्यांना कोण सांगणार? जर ते हे समजण्याइतकेही सुजाण नसतील तर कलाकार म्हणून त्यांना गंभीर आत्मपरीक्षणाची नक्कीच गरज आहे. रोजच्या रोज तेच कृत्रिम हावभाव, रडारड आणि ओढून-ताणून केलेली संवादफेक बघून कोणताही चित्रपट दिग्दर्शक अशा पात्रांना मोठ्या पडद्यावर घेण्याचे धाडस करणार नाही. पूर्वीच्या काळात क्रिएटिव्ह टीम आणि तंत्रज्ञांसोबत सेटवर कलाकारही आपल्या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत असत मग ती भूमिका कितीही छोटी का असेना! कलाकारांचा प्रत्यक्ष लेखकाशी संवाद असायचा. ते दिग्दर्शकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्यायचे. पात्राचा आलेख कसा उंचावतोय, याचा ते अभ्यास करायचे. आज शूटिंगच्या काही मिनिटे आधी हातावर स्क्रिप्ट टेकवली जाते आणि कलाकार यंत्रासारखे संवाद पाठ करून कॅमेऱ्यासमोर उभे राहतात. रिटेकवर रिटेक होतात तरीही त्यात जीव नसतो. असतो तो फक्त भडकपणा किंवा पॅरिस फॅशन शो च्या मॉडेलसारखे भाव असलेले ‘पोकर फेस’ चेहरे. अनेक हाडाचे कलाकार आणि पट्टीचे तंत्रज्ञ ज्यांनी काही काळासाठी मालिकांसाठी काम केले ते चित्रपटासाठीच्या आपल्या परिचयामध्ये मालिकांचा अनुभव लिहिणे टाळतात.
स्त्रीप्रधान मालिकांचा सुळसुळाट
बालाजी टेलिफिल्मच्या एकता कपूर निर्मित मालिकांनंतर टीआरपी मिळवून देणाऱ्या मालिकांचे एक सूत्र तयार झाले. ते वापरले आणि कथा, पटकथा, संवाद, पात्रे त्या सूत्राच्या भोवती गुंफली की झाली तयार एक पैसा कमवून देणारी कमर्शियल मालिका. मग हिंदी मालिकांचे हे फॅड आले मराठीत आणि इतर भारतीय भाषांमध्ये. फक्त संवाद मराठी करायचे आणि टीआरपी जास्त असलेल्या जसेच्या तसे मराठी प्रेक्षकांसमोर आणायचे. तर्क आणि बुद्धिच्या परिमाणांना खाली मान घालायला लावणाऱ्या आणि कधी कधी नैतिक मूल्यांना देखील वेशीवर टांगणाऱ्या या मालिकेत स्त्री स्वातंत्र्य सबलीकरणाच्या नावाने का ही ही होते. आपल्याकडे म्हटले जाते की पुत्र कुपुत्र होऊ शकतो पण माता कुमाता कधीच नसते पण एकदा आईची माहिती सांगणाऱ्या मालिका पाहा भ्रम दूर होईल. एक अतिसंवेदनशील नायिका विशेषतः सून आणि एक (किंवा अनेक) अतिशय दुष्ट खलनायिका विशेषतः सासू, नणंद किंवा चक्क सख्खी बहीण (दोन तीन किलोचा मेकअप आणि दागिने घालून) आणि त्यांच्या तालावर नाचणारे सेमी-खलनायक पुरुष रोज वेगवेगळी कटकारस्थाने करून नायिकेला छळणार आणि ती सगळ्यातून अनैसर्गिक चांगुलपणाचा आव आणत या सगळ्यातून चमत्कारिकरित्या (अगदी गोगलगायीच्या गतीने) सुटणार. असे कुठे? कुठल्या घरात असते राव? यात कसले आलेय स्त्री सबलीकरण?

मानसिक विळखा
प्रेक्षकाला हेच हवे आहे असे सांगून तोच तोच विखारी फॉर्म्युला वापरला जातो पण याचे समाजमनावर काय परिणाम होतात याचा मानसशास्त्रीय अभ्यास पण पुढे आला आहे.
आजची डेली सोप संस्कृती म्हणजे वेळेविरुद्ध लागलेली एक जीवघेणी शर्यत आहे. रोज एक भाग प्रसारित करण्याच्या या दबावामुळे कथेतील जिवंतपणा ती प्रगल्भ होण्यापूर्वीच संपून जातो. या दबावाच्या कुकरमध्ये सर्जनशीलता वाफेसारखी उडून जाते आणि मालिका म्हणजे केवळ दृश्यांची जुळवाजुळव करणारी एक असेम्ब्ली लाईन बनून राहते.
नेमकी याच वळणावर आजच्या मराठी मालिका आपली भावनिक प्रामाणिकता गमावून बसतात. पात्रांना अविरत यातना दिल्या जातात; महिलांना एक तर सती-सावित्री तरी दाखवले जाते किंवा थेट क्रूर खलनायिका. कथा पुढे नेण्यासाठी नाही तर केवळ चॅनलचे भाग वाढवण्यासाठी संघर्ष लांबवला जातो. प्रेक्षक कदाचित प्रॉडक्शनच्या तांत्रिक भाषेत हे बोलणार नाहीत पण त्यांना हा खोटेपणा लगेच जाणवतो. ती मालिका मग मनाला स्पर्श करत नाही तर केवळ एका सवयीचा भाग बनून राहते.
मानसोपचार तज्ज्ञ काय सांगतात? अविरत पुनरावृत्तीचा मनावर होणारा परिणाम
भावनांनी माखलेल्या आणि एकाच साच्यात बसवलेल्या या दृश्यांचा भडिमार प्रेक्षकांच्या मानसिक आरोग्यावर हळूहळू आघात करतो. बिंग-वॉचिंग (सतत टीव्ही पाहणे) आणि मालिकांच्या व्यसनाधीनतेवर झालेल्या जागतिक संशोधनातून असे समोर आले आहे की, अशा प्रकारच्या साहित्याचा मानवी मनावर थेट परिणाम होतो. सातत्याने नकारात्मक आणि ताणतणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पाहिल्याने तणाव, अस्वस्थता, नैराश्य आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. हे संशोधन केवळ मराठी मालिकांवर झालेले नसले, तरी ते हे स्पष्ट करते की, रोज रात्री घराघरात चालणारा हा कलहाचा खेळ प्रेक्षकांना विरंगुळा देण्याऐवजी मानसिकदृष्ट्या अधिक थकवून सोडतो.
मानवी मेंदूचा एक स्वभाव आहे, तो पुढील प्रसंगाचा अंदाज लावू लागतो. आता सासू रडणार, आता सुनेवर आळ येणार, आता ती खलनायिका काही तरी कारस्थान करणार आणि झालेला गैरसमज पुढील तीन आठवडे सुटणार नाही हे प्रेक्षकाला पक्के ठाऊक असते. सुरुवातीला यात कुतूहल असते पण काळानुरूप याचे रूपांतर चिडचिड, थकवा आणि मानसिक उद्वेगात होते. हा भावनिक थकवा काल्पनिक नाही. जेव्हा मेंदू सातत्याने अशा तणावपूर्ण परिस्थितीला सामोरा जातो तेव्हा शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे झोप उडते आणि दैनंदिन जीवनातील निर्णयक्षमतेवर परिणाम होतो.
टीव्हीच्या पडद्यावरील विष हळूहळू रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर, घरातील संवादांवर आणि कौटुंबिक वातावरणावर पसरू लागले आहे. जेव्हा मालिकेचा मुख्य गाभाच संशय, अविश्वास आणि अपमानावर आधारलेला असतो तेव्हा घरातील रोजचा ताण हा अपवाद न राहता एक नियम बनून जातो. आधीच वैयक्तिक आयुष्यात तणावाचा सामना करणाऱ्या व्यक्तिंसाठी या मालिका विरंगुळा ठरण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारख्या ठरतात.
काही लोक म्हणतात, “आम्ही फक्त टाईमपास म्हणून बघतो” पण मानवी मज्जासंस्था ती दृश्ये केवळ टाईमपास म्हणून स्वीकारत नाही. आपण जे पाहतो, त्यातील भावनिक कंपने आपल्या मनात साठत राहतात. मानसशास्त्रातील अभ्यासानुसार अनेकदा लोक आपल्या खऱ्या आयुष्यातील दुःखातून पळ काढण्यासाठी टीव्हीचा आधार घेतात; परंतु तिथेही जर नकारात्मकता मिळाली तर ते मानसिक आरोग्य सुधारण्याऐवजी अधिक खालावते. थोडक्यात सांगायचे तर जे माध्यम विरंगुळा म्हणून सुरू झाले होते, ते शेवटी एक मानसिक ओझे बनून संपते.
समस्या फक्त मालिका दर्जेदार नसणे एवढीच नाही. समस्या ही आहे की, या मालिका प्रेक्षकांना अविश्वास, निष्क्रियता आणि आघातांच्या एका दुष्टचक्रात जगण्याची सवय लावतात. जेव्हा कथानक केवळ छळ, चहाडी, पात्रांचे अचानक गायब होणे आणि न्यायाला होणारा अंतहीन उशीर यावरच अवलंबून असते तेव्हा ते कुटुंबाबद्दल आणि नात्यांबद्दल प्रेक्षकांच्या मनात एक विकृत दृष्टिकोन तयार करते. याचा अर्थ असा नाही की टीव्हीमुळे मानसिक आजार होतात पण संवेदनशील मनातील तणाव वाढवण्यास या मालिका नक्कीच खतपाणी घालतात.
प्रेक्षकांची खरी गरज
टीआरपीचे आकडे, ओटीटीचा वेगवान विस्तार आणि प्रेक्षकांची बदलती चव हे सगळे आपल्याला एकच गोष्ट ओरडून सांगत आहेत माध्यम वेगाने बदलत आहे. मराठी मालिकांना पुन्हा उभे राहायचे असेल तर या काही गोष्टी निर्णायक ठरतील. प्रथमतः रबरासारख्या मालिका ताणण्याऐवजी मर्यादित भागांची शिस्त पाळणे आवश्यक आहे. पटकथेला साहित्याचा आणि संशोधनाचा भक्कम पाया हवा. महाराष्ट्राचे बहुविध वास्तव, श्रमिक वर्ग, नव्या पिढीचे प्रश्न आणि खऱ्या स्त्री-सक्षमीकरणाचे प्रामाणिक चित्रण पडद्यावर यायला हवे. टीआरपीला अंतिम देव मानण्याऐवजी, आशयाला अग्रक्रम दिला गेला पाहिजे.
जर मराठी मालिकांनी वेळेवर या वास्तवाचे भान ठेवले नाही आणि बदलांशी जुळवून घेतले नाही तर उद्याच्या पिढीसाठी मराठी टेलिव्हिजन हा केवळ एक नॉस्टॅल्जिया बनून राहील. प्रेक्षक आता मूर्ख राहिलेला नाही, तो सजग झाला आहे. जोपर्यंत मालिकांचे निर्माते आपल्या प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या मानसिक शांतीचा आणि सांस्कृतिक वारशाचा आदर करायला शिकत नाहीत तोपर्यंत रिमोटचे पॉवर बटण दाबून टीव्ही बंद करणे, हाच प्रेक्षकांचा सर्वात मोठा आणि मूक उठाव असेल.
वेळ अजूनही गेलेली नाही, फक्त कॅमेऱ्याची दिशा बदलण्याची आणि लेखणीची धार वाढवण्याची नितांत गरज आहे.
- ज्योती घनश्याम
9901164468
मासिक साहित्य चपराक जुलै २०२६
.jpg)



Shokantika!
Truth