मराठी कवितेची साक्षेपी समीक्षा : जुन्या वाटा नवी वळणे
- 1 minute ago
- 5 min read
मराठीचे व्यासंगी अभ्यासक व प्रसिद्ध समीक्षक प्रा. सुहासकुमार बोबडे यांचा ‘जुन्या वाटा नवी वळणे’ हा निवडक मराठी कवितेची समीक्षा करणारा ग्रंथ श्री समर्थ प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला आहे. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना काव्यसंग्रहाचे अध्यापन करत असताना कवितेविषयीची आवड प्रा. सुहासकुमार बोबडे यांच्यामध्ये निर्माण झाली. मनोगतामध्ये ते म्हणतात, “मी वृत्तीने समीक्षक नाही. मी जरी कवी म्हणून प्रसिद्ध नसलो तरी माझा मुळचा पिंड मात्र कवीचा आहे. साहजिकच एक कवी दुसऱ्या कवीला ज्या प्रकारे समजू शकतो तो दृष्टिकोन समीक्षकाचा असेलच असे नाही. विद्यापीठीय पातळीवर वेगवेगळे मान्यवर कवी शिकवत असताना त्यांच्या कवितेतील काही अंशी मला जो नवा आशय गवसला तो मी येथे नोंदवला आहे.”
जुन्या वाटा नवी वळणे या समीक्षा ग्रंथास प्रा. वसंत नरहर कुबेर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. प्रा. कुबेर म्हणतात, “प्राध्यापक सुहासकुमार बोबडे यांचे प्रस्तुत लेखन प्रामुख्याने अध्यापनाच्या गरजेतून जो अभ्यास झाला किंवा करावा लागला त्याला दिलेले शब्द रूप आहे. गेल्या काही वर्षात वेळोवेळी केलेले हे लेखन निरनिराळ्या दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिकामधून प्रसिद्ध झाले आहे तर काही अप्रसिद्ध लेखही या संग्रहातून प्रथमच प्रसिद्ध होत आहेत. हे लेख वाचताना समीक्षक या नात्याने प्रा. बोबडे यांचा विकास कसा झाला असावा याचीही कल्पना येते.”
प्रा. सुहासकुमार बोबडे यांचे मृत्युलेखकार आचार्य अत्रे व रामनगरी आणि माझे विद्यापीठ एक संवाद हे समीक्षा ग्रंथ यापूर्वीच प्रसिद्ध झालेले आहेत. प्रा. बोबडे हे अध्यापन हे व्रत मानून विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. अध्यापन करण्यापूर्वी ते पूर्वतयारी म्हणून विषयाचा सखोल अभ्यास करतात हे त्यांच्या लेखनावरून जाणवते. वर्तमानात व्रतस्थपणे अध्यापन करणारे अध्यापक दुर्मीळ होत चालले आहेत. साहित्याचे अध्यापन करताना विशेषत: कवितेचे अध्यापन करताना ते अधिक खुलतात. जुन्या वाटा नवी वळणे या समीक्षा ग्रंथात एकूण एकवीस लेख आहेत. कवितेचा आस्वाद घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व अध्यापन करणाऱ्या अध्यापकांसाठी हा समीक्षा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
माणसातल्या माणसाला आवाहन करणारी बहिणाबाईंची कविता या पहिल्याच लेखात बहिणाबाईंच्या कवितेचे रसग्रहण त्यांनी आस्वादक दृष्टिकोनातून केले आहे. 1952 मध्ये आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी महाराष्ट्रासमोर आणली. बहिणाबाईंची गाणी माणसातल्या माणसाला कशी आवाहन करतात याचे वर्णन प्रा. बोबडे यांनी केले आहे. बहिणाबाईंनी माणसातलं माणूसपण माणसाला दाखवून दिलं आहे. त्या माणसातलं उणेपण न शोधता त्याचं भलेपण कशात आहे याचाच शोध घेतात. हा शोध त्यांनी घेतला आहे तो माणसातल्या माणसाला आवाहन करून. बहिणाबाईंचे हे आवाहन जर माणसाने आव्हान म्हणून पेलले तर तो बहिणाबाईंना अभिप्रेत असणारा माणूस होईलच यात शंका नाही, या बोबडे यांच्या विधानाशी आपण सहमत होतो.
प्रेम आणि मरण : एक चिंतन या लेखातून गोविंदाग्रज यांच्या प्रेम आणि मरण या कवितेचे रसग्रहण केले आहे. “गोविंदाग्रज हे तर प्रणयपंढरीचे वारकरी. मराठी कवितेतील प्रेमाचे शाहीर. त्यांच्या प्रेम आणि मरण या कवितेत तर प्रेमभावनेचे चिरंतन लावण्य आणि विलक्षण सामर्थ्य चित्रित झाले आहे. ह्या खंड काव्यात्मक कवितेत वृक्ष आणि आकाशस्थ बिजली यांच्या प्रीतीतील समर्पण भावनेने काव्याला चिरस्थायी सौंदर्य तर लाभले आहेच पण प्रेमभावनेचे एक विलक्षण तत्त्वज्ञानही व्यक्त झाले आहे. प्रीतीतील आकर्षण आणि ह्या आकर्षणातून निर्माण झालेली आसक्ती. प्रेमिकाला ज्या बाबीची आसक्ती प्राप्त होते ती एक बाब सोडून सर्वच बाबतीत त्याला कशी विरक्त करून टाकते आणि प्रीतीमधील या आकर्षणापायी प्रेमिकाची स्थिती कशी होते व त्याला काय काय भोगावे लागते हे गोविंदाग्रजांनी वृक्ष आणि बिजलीच्या रूपकातून अत्यंत परिणामकारक शैलीत सांगितले आहे” असे वर्णन लेखकाने केले आहे. मराठी रसिकमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कवितेचे रसग्रहण करणारे काही लेख या समीक्षा ग्रंथात आहेत. कुसुमाग्रजांच्या कवितेतील पोक्त प्रेमानुभव हा लेख अभ्यासपूर्ण असून या लेखात प्रेम ही मानवी जीवनातील एकच भावना असली तरी प्रत्येक कवीचा या भावनेकडे पाण्याचा दृष्टिकोन कसा निराळा असतो याचे वर्णन प्रा. बोबडे यांनी केलेले आहे. विशाखा हा कुसुमाग्रज यांचा गाजलेला कवितासंग्रह आहे.
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं...
या कवितेचे सुंदर रसग्रहण लेखकाने केले असून वाचकांनी ते मुळापासून वाचणे आवश्यक आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेचे समीक्षण करताना प्रा. बोबडे लिहितात, “सत्य, न्याय, दया, त्याग, सविष्णुता, ध्येयवाद यांची पूजा कुसुमाग्रजांनी आपल्या काव्यात बांधली. केशवसुतांनी नरेची केला हीन किती नर याबद्दल चिंता व्यक्त केली पण कुसुमाग्रजांनी नरातील नारायणाची पूजा मांडली. मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांनी समाजाकडे पाहिले. त्यामुळे त्यांच्या कवितेतून मानवतावादाचा स्त्रोत पाझरत राहिला. त्यांनी जे आदर्श आपल्या काव्यातून सांगितले ते नुसते बेगडी नव्हते तर त्याला वास्तवाभिमुखतेची जोड होती. तात्पर्य, कुसुमाग्रजांच्या कवितेतील प्रतिभा जरी सूर्यापर्यंत जाऊन पोहोचल्या असल्या तरी त्यांचे पाय मात्र या मातीतच आहेत याचे प्रत्यंतर त्यांच्या कवितेत पदोपदी येत राहते.
महावृक्ष सामाजिक वेदनेचे काव्य व जीवनाचा वेदमंत्र या लेखात कुसुमाग्रजांच्या कवितेचे रसग्रहण केले आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत जीवनवाद, आदर्शवाद, ध्येयवाद याच बरोबरीने समाजातील दंभ, ढोंग याविषयीची घृणा व्यक्त होताना दिसते. त्यांच्या प्रतिभेने वेळोवेळी समाजात घडत असलेल्या स्पंदनांना आपल्या कवितेत विषय बनवले आहे असे लेखाच्या सुरुवातीला प्रा. बोबडे प्रतिपादन करतात. कुसुमाग्रजांच्या कवितेचे महानत्व विशद करताना पुढे लेखक म्हणतात, “कुसुमाग्रजांच्या प्रतिभेने अनेक काव्यविषय अभिव्यक्त केले आहेत. किंबहुना त्यांच्या कवितेचा विकास होत असताना मराठी कवितेत होत असणारी स्थित्यंतरे त्यांच्या कवितेने अनुभवली. त्यांना जीवनाबद्दल नितांत श्रद्धा व निष्ठा आहे. जीवनपोषक शक्तीबद्दलचा पूज्यभाव त्यांच्या मनात जसा आहे, त्याचप्रमाणे जीवनशोषक प्रवृत्तीचेही त्यांचे चिंतन काहीसे निराळे आहे. विश्वातल्या, सृष्टीतल्या, निसर्गातल्या कित्येक घटकांमध्ये त्यांना जीवनाचा सुबोध होतो. कुसुमाग्रजांच्या चिंतनशीलतेचे वर्णन लेखकाने केले आहे.
शांता शेळके यांच्या कवितेचा आस्वादक दृष्टिकोनातून वेध प्रा. सुहासकुमार बोबडे यांनी कौशल्याने घेतला आहे. कवितेतून आपल्या मनातील भावना व्यक्त करीत असताना त्यांची कविता आत्ममग्न होते. त्यांच्या कवितेत स्वप्न आणि वास्तव यांच्या मध्यभागी उभे असणारे हळवे स्त्री मन आहे. त्यांच्या आत्मलक्षी कवितांमधून त्यांच्या मनातील जीवनव्यापी वेदनेचा स्पष्टपणे अनुभव येतो. याविषयी विवेचन करताना लेखक म्हणतात, “काव्यातून आपल्या मनातील भावना व्यक्त करीत असताना त्यांची कविता आत्ममग्न होते. त्यांच्या कवितेत स्वप्न आणि वास्तव यांच्या मध्यभागी उभे असणारे हळवे स्त्रीमन आहे. त्यामुळेच की काय, त्यांच्या आत्मलक्षी कवितांमधून त्यांच्या मनातील जीवनव्यापी वेदनेचा अनुभव स्पष्टपणे येतो. शांताबाईंनी अनेक काव्यप्रकारांमधून स्वतःला अभिव्यक्त केले आहे. आपले भावविश्व फुलविले आहे मात्र धगधगता निखारा जरी फुलांनी झाकला तरी फुलायचा थांबत नाही, तसे शांताबाईंचे भावविश्व आहे.
विंदांच्या कवितेतील मूल्यविचार व जाणिवांची जपणूक करणारी विंदांची कविता या लेखांमधून ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित विंदांच्या कवितेचे रसग्रहण लेखकाने केले आहे. जडणघडणीच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास विंदांची कविता ही केशवसुतांच्या सामाजिक कवितेच्या अंगानेच जरी रूपाला आली असली तरीही करंदीकरांच्याच म्हणून विचारांची असणारी वैचारिक मौलिकता ह्या कवितेला लाभलेली आहे. करंदीकरांची कविता ही सर्वसामान्य माणसावरील कविता आहे परंतु तिची अभिव्यक्ती पाहता ती सामान्य वाचकाला पेलणारी नाही. साहजिकच सर्वसामान्यांच्या जीवनातील सामान्य बाबींवरील ती गहन चिंतन करते. ही कविता विक्षिप्त कल्पना आणि विक्षिप्त प्रतिमांच्या साह्याने प्रकटते आणि जीवनाचे जे सत्य मूल्य आहे, त्याविषयीचा मौलिक विचार सांगून जाते.”
अर्थहीनतेला अर्थ देणारा कवी : आरती प्रभू हा या ग्रंथातील नितांत सुंदर लेख आहे. प्रा. बोबडे म्हणतात, “नक्षत्रांचे देणे मधील कवितांमध्ये आहे ते आरती प्रभूंचे चिंतन... हे चिंतन वैविध्यपूर्ण आहे. ते कवितेविषयी आहे. प्रेमाविषयी आणि प्रेयसीविषयी आहे. जीवनातील अर्थहिनतेविषयी आहे आणि अखेरीस मृत्युविषयी आहे. ह्या कवीला एकसारखा अज्ञाताचा ध्यास लागला आहे आणि ह्या अज्ञाताला व्यक्त करण्यासाठीच त्याने कवितेचा आश्रय घेतला आहे. हे नक्षत्राचे देणे म्हणजे कविमनातील अज्ञाताला ज्ञातात परिवर्तित करण्याची तळमळ आहे. जोगवा, दिवेलागण, नक्षत्रांचे देणे कवितासंग्रहातील कवींचा परिचय लेखकाने करून दिला आहे. वेगळ्या रंगाचा आगळा कवी या लेखातून मराठीमध्ये गझल हा काव्यप्रकार खऱ्या अर्थाने लोकप्रिय करणाऱ्या सुरेश भट यांच्या गझलांचा आस्वादक वेध घेतला आहे. लेखक वर्णन करतात, “ह्या कवीचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व आहे. रूपगंधा, रंग माझा वेगळा आणि एल्गारमधील बहुतेक गझलांमध्ये आशयाची विविधता येते. या कवितेत स्त्री मनाची भावस्पंदने आहेत. प्रेयसीने दिलवराची केलेली आराधना आहे. शृंगारातील उत्कटता आहे. प्रियतमेची तळमळ आहे. कवीची जीवनाबद्दलची निराशा आहे. ही निराशा उदंड आहे आणि त्यातूनच दुनियेबद्दलची गैरमर्जी आलेली आहे. बऱ्याच वेळा दुनियेबद्दलची बेफिकिरी या कवितेत येते. त्याचप्रमाणे ही कविता सामाजिक विचारही मांडताना दिसते. त्यामुळे आरंभीचे प्रेम, भक्ती, स्त्रीसौंदर्य, शराब, खुदा एवढेच मर्यादित विषय ही गझल अभिव्यक्त करत नाही. मालवून टाक दीप सारे, तरूण आहे रात्र अजुनी, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा इत्यादी गझलांचा आशय लेखकाने उलगडून दाखवला आहे. वसंत बापट, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे यांच्या कवितेतील सामर्थ्य लेखकाने विशद केले आहे.
एकूणच साहित्याचे विद्यार्थी, अध्यापक, संशोधक व रसिकांसाठी जुन्या वाटा नवी वळणे हा समीक्षा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
जुन्या वाटा नवी वळणे
प्रा. सुहासकुमार बोबडे
श्रीसमर्थ प्रकाशन, पुणे
पृष्ठ - 248, मूल्य - 400 रूपये
- डॉ. राजेंद्र थोरात, पुणे
साहित्य चपराक मासिक जुलै २०२६
.jpg)



Comments