top of page

ऑपरेशन बिनविरोध

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘400 पार’चा नारा देत असलेल्या भाजपाने मतदानप्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी आणि निकाल लागण्याआधीच पहिला विजय मिळवला आहे. सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांच्याबाबत ही घटना घडली असून त्यांचा विजय जाहीर करण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार नाही. त्यामुळे यंदाचा ‘देशातील पहिला विजेता उमेदवार’ म्हणून दलाल यांची नोंद घ्यावी लागेल. त्याचे झाले असे की, येथील काँगे्रसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. प्रदेश काँगे्रसला अंधारात ठेवत त्यांनी त्यांच्या उमेदवारी नामांकन अर्जासोबत प्रस्तावक म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांऐवजी त्यांचे मेव्हणे जगदीया सावलिया आणि उद्योगातील भागीदार धु्रविन धामोलिया व रमेश पोलरा यांची नावे टाकली. काँग्रेसने इथून जो डमी उमेदवार दिला होता त्या सुरेश पडसाला यांचाही प्रस्तावक म्हणून कुंभाणी यांनी त्यांचे भाचे भौतिक कोलडिया यांचे नाव टाकण्याची काळजी घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस उमेदवाराचा आणि त्यांच्या डमीचा एकही प्रस्तावक उपस्थित राहिला नाही. दरम्यान इथून उमेदवारांचा ज्यांनी प्रस्ताव दिला होता त्या सर्वांनी ‘हा आमचा प्रस्ताव नसून आमचे बोगस हस्ताक्षर आहे,’ असे पत्र निवडणूक आयोगाकडे दिले. त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता ते सर्वजण गायब झाले. त्यामुळे कुंभाणी आणि पडसाला यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. इथून बहुजन समाज पक्षाचे प्यारेलाल भारती आणि इतर चार अपक्षांनी अर्ज भरले होते. मुकेश दलाल यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची बैठक घेऊन त्या सर्वांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सांगितले. साम, दाम, दंड, भेद याचा वापर करत ही बैठक पार पडल्याने शेवटच्या दिवशी सर्वांनीच आपापले अर्ज मागे घेतले. त्यामुळे या ठिकाणी भाजपाचे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार उरले आहेत.हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://www.youtube.com/watch?v=fcuAawFDXEA 1984 सालापासून सूरतची जागा भाजप जिंकत आला आहे. यंदा 7 मे रोजी इथून मतदान होणार होते मात्र त्यापूर्वीच या सगळ्या घटना घडल्या. गुजरातमधून आजवर एकही खासदार बिनविरोध म्हणून निवडून आला नाही. यंदाच्या या नाट्यमय घडामोडींमुळे राजकारणाची पातळी कुठपर्यंत घसरली आहे ते दिसून येतेय. या क्षेत्रातील काही बौद्धिक चाणक्य या घडामोडीकडे भाजपची व्यूहनीती म्हणून बघत असले तरी लोकशाही व्यवस्थेची ही क्रूर चेष्ठा आहे. ‘ऑपरेशन बिनविरोध’ ही संकल्पना राबवून भविष्यात काहीही करून विरोधक शिल्लक ठेवायचे नाहीत, असे सूत्र राबवले जात आहे. यंदा देशात भाजपचा जो पहिला उमेदवार विजयी ठरला आहे त्याचे आडनाव दलाल असल्याने भाजपच्या ‘दलाली’ची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे. - घनश्याम पाटील 7057292092 दैनिक पुण्य नगरी, 1 मे 2024

Recent Posts

See All
The beginning of change - Ghanshyam Patil

It is a law of nature that any person or organization rises to the top and starts to fall again. That is, when you climb a mountain, you have to go down again. In that case, there is some flat area on

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page