शेतमालाचे बाजारभाव पडल्याने बळीराजा हैराण
- 3 days ago
- 1 min read
कदमवाकवस्ती, (चंद्रकांत दुंडे) : अमेरिका,
इस्रायल, इराण युद्धाची सध्याची परिस्थिती यामुळे व्यावसायिक सिलेंडरवर आलेले निर्बंध ! यामुळे साधारणपणे पन्नास टक्के हॉटेल व्यवसायावर परिणाम होऊन सिलेंडर मिळत नसल्याने बऱ्याच हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका बळीराजाला बसत आहे.
मार्केटमध्ये आवक जास्त आणि मागणी कमी अशीच अवस्था आहे. त्यामुळे इतक्या कडक उन्हाळ्यात मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, कांदापात अशा भाजीपाल्याला दोन रुपयांपासून ते पाच रुपयांपर्यंत असा मातीमोल बाजारभाव मिळत आहे. उत्पादन खर्चही वसुल होत नाही, त्यामुळे बळीराजावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या पीक कर्जाला कर्जमाफी दिली आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमित कर्ज भरणारे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. सरसकट कर्ज माफ करण्याची मागणी करत आहेत. नियमित कर्जदारांनी प्रथम ३१ मार्चपूर्वी कर्ज भरले तरच प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे परंतु शेतमालाचे बाजारभाव पाहता घर चालवायला पैसे नाहीत तर कर्ज भरण्यासाठी पैसे आणायचे कोठून ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आ वासून उभा आहे.
प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक १६ ते २२ मार्च २०२६
.jpg)


Comments