स्वरानंदच्या वाटचालीचा सुरेख मागोवा
- 26 minutes ago
- 3 min read
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्याचे सांस्कृतिक विश्व अनेक अंगांनी समृद्ध होत गेले. यामध्ये संगीताचा विचार केला तर शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आर्य संगीत प्रसारक मंडळ आणि सुगम संगीताच्या क्षेत्रात स्वरानंद प्रतिष्ठान ही नावे प्रामुख्याने घ्यावीच लागतील. स्वरानंद प्रतिष्ठान गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ एकाहून एक उत्तम असे दर्जेदार सुगम संगीताचे कार्यक्रम घेऊन रसिकांसमोर आली आहे. या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आणि प्रथमपासूनचे कार्यकर्ते प्रा. प्रकाश भोंडे यांनी स्वरांनंद च्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा सुरेख मागोवा ' सुवर्ण महोत्सवी स्वरानंद' या ग्रंथाद्वारे घेतला आहे.
सात नोव्हेंबर १९७०या दिवशी लक्ष्मी क्रीडा मंदिर पुणे येथे 'आपली आवड' या कार्यक्रमाद्वारा स्वरानंदने सुगम संगीत सादरीकरणाच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. हरीश देसाई, विश्वनाथ ओक, प्रकाश भोंडे या उत्साही तरुणांनी या संस्थेची धुरा खांद्यावर घेतली आणि तिथपासून प्रकाश भोंडे आणि स्वरानंद हे जणू अद्वैतच झाले आहे. स्वरानंदच्या स्थापनेचे श्रेय प्रा.भोंडे हे बीएमसीसी या कॉलेजला देतात. भोंडे याच कॉलेजचे विद्यार्थी आणि स्नेहसंमेनात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात अरुण नूलकर, सुधीर दातार, बाबा देसाई, विश्वनाथ ओक आणि प्रकाश भोंडे ही मंडळी रंगमंचावर आणि रंगमंचाच्या मागे कार्यरत असायची. अशाच कार्यक्रमातून स्वरानंदची कल्पना निर्माण सुचली. हा ६६ ते ७० चा काळ.
१९७० साली शुभारंभ केलेल्या स्वरानंदने पुढील अर्थशतकात आपली आवड, मंतरलेल्या चैत्रबनात, नमन मृत्युंजय वीरा, पुलकित गाणी, स्वरतीर्थ, आनंद गाणी, मी निरांजनातील वात, देवगाणी असे एकाहून एक सरस कार्यक्रम रसिकांपुढे सादर केले. यातील प्रचंड लोकप्रियता लाभलेला कार्यक्रम म्हणजे 'मंतरलेल्या चैत्रबनात '. गदिमा गीतांच्या या कार्यक्रमाने सुगम संगीताच्या क्षेत्रात अनेक मानदंड स्थापन केले. आजही स्वरानंद म्हटलं की आठवण होते 'चैत्रबन'चीच. आज साधारण सत्तरीच्या पुढे असलेल्या पिढीने स्वरानंदचा हा प्रवास अनुभवला आहे.
१७ डिसेंबर १९७६ हा तो भाग्याचा दिवस ज्या दिवशी 'मंतरलेल्या चैत्रबनात' हा कार्यक्रम भरत नाट्य मंदिरात सादर झाला याचे वैशिष्ट्य असे होते की गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे ही त्रिमूर्ती प्रथम रांगेत कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी हजर होती. या कार्यक्रमाचे अतिशय सुरेख प्रवाही निवेदन केले होते सुधीर मोघे यांनी. कालांतराने या कार्यक्रमाच्या असंख्य प्रयोगांची निवेदक म्हणून जबाबदारी सुधीर गाडगीळ यांनी स्वीकारली होती.
एखादी संस्था चालवायची म्हणजे कंटकाकीर्ण मार्ग असतो. सारेच काही सुरळीत होत नाही. याची प्रचिती प्राध्यापक भोंडे यांनाही आली. जेमतेम वीस प्रयोग होतात न होतात तोच निवेदक सुधीर मोघे, तबला वादक अरुण नूलकर, बासरी वादक अजित सोमण, आणि ढोलकी वादक सुहास तांबे यांनी एकत्रितपणे संस्थेतून बाहेर पडायचा धक्कादायक निर्णय घेतला. ही घटना मन अस्वस्थ करणारी होतीच पण 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीला अनुसरून पुढील वाट शोधणे हाच पर्याय होता. पण हा शोध सोपा नव्हता. लेखकाचा शब्दात सांगायचे झाले तर "कलाकार म्हणजे काही एखादे वाद्य नव्हते की एक गेले आणि त्या जागी दुसरे आणून काम पुढे चालू ठेवले. कलाकाराच्या जागी पर्यायी कलाकार आणून कार्यक्रम करणे हे नुसते क्लेशदायक, बेचैनी आणणारे असते असे नाही तर त्यामुळे मनोधैर्य खचते हे महत्त्वाचे"
पण या सर्व प्रतिकूलतेवर मात करीत प्रकाश भोंडे यांनी स्वरानंद चा ध्वज दिमाखाने फडकत ठेवला आणि दोन वर्षातच चक्क सुवर्ण महोत्सवी प्रयोगापर्यंत मजल मारली. त्यानंतर काळाच्या ओघात अनेक गायक, वादक बदलले, निवेदक बदलले पण चैत्रबनची लोकप्रियता अबाधितच राहिली ती आजतागायत.
यानंतर प्रयोगांचा झपाटा जबरदस्त होता आणि, १७ मार्च १९७९ या दिवशी चक्क शंभरावा प्रयोग टिळक स्मारक मंदिरात साजरा झाला याप्रसंगी प्रमुख पाहुणे होते उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर यानिमित्ताने एक सुंदर स्मरणिकाही प्रकाशित केली गेली त्यामध्ये या प्रयोगाला शुभेच्छा देणारे संदेशही समाविष्ट झाले.
'चैत्रबन' ही स्वरानंदची खास ओळख असल्याने थोडे सविस्तर विवेचन करावे लागले पण त्या व्यतिरिक्त वेळोवेळी अनेक दर्जेदार कार्यक्रम या संस्थेने दिले आहेत. यामध्ये स्वर आले दुरुनी हा यशवंत देवांच्या रचनांचा कार्यक्रम ७ मार्च १९८१ रोजी सादर झाला यावेळी मंगेश पाडगावकर हे प्रमुख पाहुणे होते.
यानंतर पु ल देशपांडे यांनी संगीत दिलेल्या रचनांचा कार्यक्रम पुलकित गाणी या नावाने १७ ऑगस्ट १९७७ला भरत नाट्य मंदिरात झाला यावेळी गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर यांनी निवेदनाची जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडली.
असेच काही कार्यक्रम म्हणजे कवी शांताराम आठवले यांच्या रचनांवर आधारित 'आधी बीज एकले,' स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचना 'नमन मृत्युंजय वीरा' या कार्यक्रमाद्वारे सादर झाल्या तर 'रिमझिम स्वरांची' हा सुमन कल्याणपुर यांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रमही त्यांच्याच उपस्थितीत सादर करण्याचे भाग्य या संस्थेला लाभले. सुधीर फडके यांच्या रचना ' स्वर तीर्थ' या कार्यक्रमाद्वारे सादर केल्या. ज्येष्ठ भावगीत गायक गजाननराव वाटवे यांनी गायलेली गाणी 'मी निरांजनातील वात' या शीर्षकानं सादर केली गेली. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या रचना 'स्वरप्रतिभा' या कार्यक्रमाद्वारे रसिकांपुढे पुढे आल्या हे आणि असे अनेक कार्यक्रम वेळोवेळी सादर करून स्वरानंदने मराठी रसिकांची दाद मिळवली. शब्दमर्यादेमुळे सर्वच कार्यक्रमांचा परामर्श घेता येत नाही. त्यासाठी हे पुस्तकच वाचले पाहिजे.
'सुवर्ण महोत्सवी स्वरानंद' हा ग्रंथ म्हणजे केवळ पुस्तक नाही तर त्याला एखाद्या ऐतिहासिक बखरीचे मोल आहे. गेल्या ५० वर्षांचा हा इतिहास वाचताना मला स्मरणरंजनाचा जो अनुभव मिळाला तो शब्दात सांगता येत नाही
प्रा. भोंडे यांनी हा सर्व प्रवास शब्दबद्ध करून मराठी रसिका वर खूप मोठे उपकार केले आहेत असा प्रांजळपणे म्हणावसं वाटते. मराठी रसिक या ग्रंथाला भरभरून दाद देखील याची खात्री आहे
सुवर्ण महोत्सवी स्वरांनंद
ले.- प्रकाश भोंडे
अनुबंध प्रकाशन, पुणे.
अरुण कमळापूरकर, पुणे
7972573894
साहित्य चपराक मासिक जुलै २०२६
.jpg)



Comments